हातखंबा येथे चिऱ्याच्या ट्रकला अपघात, प्रवासी जखमी

रत्नागिरी, ६ डिसेंबर २०२२ : मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा ईश्वर ढाबा येथे सोमवारी (ता. ५) सायंकाळी सहाच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात ट्रकमधून प्रवास करणारा एकजण जखमी झाला. त्याला उपचारासाठी रत्नागिरी सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे, की मुंबई-गोवा महामार्गाचे एका बाजूचे काम सुरू असल्याने दुसऱ्या बाजूने वाहतूक सुरू आहे. दरम्यान, जाकादेवीहून साताऱ्याच्या दिशेने ट्रकमधून चिरा घेऊन चालक नवनाथ जाधव जात होता. यावेळी चालकाने निवळी येथे प्रवासी घेतले. त्यानंतर हातखंबाच्या दिशेने रवाना झाला. मात्र, महामार्गावर मातीचा भराव टाकून लेव्हल करण्यात येत आहे. हातखंबा येथील ईश्वर ढाब्यासमोरील मातीच्या भरावात ट्रकची चाके रुतल्याने ट्रक डाव्या बाजूला कलंडला. ट्रक कलंडताच गाडीतील सारे चिरे बाहेर फेकले गेले. यामध्ये ट्रकमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाला दुखापत झाली. प्रवाशाचे नाव समजू शकले नाही. ग्रामस्थांनी ‘पीडब्ल्यूडी’च्या गाडीने जखमी प्रवाशाला रत्नागिरी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यासाठी रवाना केले. या अपघातात ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अपघाताची माहिती मिळताच हातखंबा ट्रॅफिक पोलिस पावसकर, भरणकर; तसेच होमगार्ड शिंदे, आणि निंगावले हे घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान, महामार्गावर ठीकठिकाणी चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याचे फलक लावणे आवश्यक आहे. रस्त्याच्या कडेला टाकण्यात आलेल्या मातीच्या भरावावरून रात्रीच्या वेळेस मोठ्या ट्रकचालकांना अंदाज येत नसल्याने अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : जमीर खलफे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा