अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत 27 तारखेपर्यंत वाढ!

मुंबई, 15 डिसेंबर 2021: 100 कोटींच्या खंडणी प्रकरणी सध्या आर्थर रोड जेल कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी अद्याप संपायचं नाव घेत नाहीयेत. न्यायालयाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये वाढ केली असून त्यामुळे अनिल देशमुख लवकर तुरुंगातून बाहेर येण्याच्या आशा मावळल्या आहेत. आता येत्या २७ डिसेंबरपर्यंत अनिल देशमुख यांचा न्यायालयीन कोठडीमधला मुक्काम वाढला आहे.
आता या प्रकरणाला नवीन वळण लागण्याची शक्यता आहे. कारण सचिन वाझे यांनी काल राज्य सरकारने नियुक्त केलेल्या उच्चस्तरीय चांदीवाल आयोगासमोर अनिल देशमुखांनी 100 कोटींच्या खंडणीची मागणी केलीच नव्हती, असा खळबळजनक दावा केलाय. आपण शहरातील बार किंवा हॉटेलच्या मालकांकांकडून किंवा त्यांच्या संबंधितांकडून कधीही पैसे गोळा केले नाहीत, असं देखील सचिन वाझेंनी चांदीवाल आयोगासमोर सांगितलं आहे.
 “माजी गृहमंत्री अनिल देशमुख किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचार्‍यांनी कधीही पैशांची मागणी केलेली नाही, असे सचिन वाझे यांनी सांगितले. तसेच मी शहरातील कोणत्याही बार मालकांकडून किंवा त्यांच्याशी संबंधित लोकांकडून पैसे घेतलेले नाहीत,” असं वाझेंनी स्पष्ट केलं. यासंदर्भात फ्री प्रेस जर्नलने वृत्त दिलंय.
या पार्श्वभूीवर सचिन वाझेंचा हा खुलासा म्हणजे अनिल देशमुख यांना त्यांच्यावरील १०० कोटींच्या आरोपांबाबत क्लीनचिट असल्याचंच बोललं जात आहे. मात्र, दुसरीकडे अनिल देशमुखांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आल्यामुळे त्यांच्या अडचणी अद्याप संपण्याची चिन्ह दिसत नाहीयेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा