अतुल खत्रीला मुंबई पोलिसांनी दिलं त्याच्याच भाषेत उत्तर

मुंबई, २ नोव्हेंबर २०२२ :देशाची आर्थिक राजधानी मुंबई मधे कालपासून चार चाकींसाठी सीट बेल्ट लावणं हे बंधनकारक करण्यात आलंय. सीट बेल्ट न लावणाऱ्यांवर मुंबई पोलिस कडक कारवाई करणार आहेत. सीट बेल्ट न लावणाऱ्याना मोटार वाहन कायदा २०१९ च्या कलम १४९B अंतर्गत शिक्षा केली जाईल. कारवाई सुरु करण्यापूर्वी चे १० दिवस मुंबई पोलिस याविषयी लोकांमधे जनजागृती करणार आहेत.

हे सर्व कायदे- नियम का केलेत? तर ते लोकांच्या सुरक्षेसाठी, अपघात रोखण्यासाठी, त्यांच्या अमूल्य जीव वाचवण्यासाठी. पण लोक या गोष्टी गांभीर्यानं घेत नाहीत. नुकताच भारतीय स्टँड अप कॉमेडियन आणि प्रसिध्द यूट्यूबर अतुल खत्री यानं ट्विटर वर एक फोटो शेअर करत लोकांना संदेश दिला की, “मुंबईकरांनो कृपया सीटबेल्ट लावा नाहीतर हा टीशर्ट विकत घ्या”. (ज्या टीशर्ट वर सीट बेल्ट चा फोटो प्रिंट केलेला आहे). त्याच्या म्हणण्याचा उद्देश असा होता की, जर तुम्हाला सीट बेल्ट लावायचा नसेल तर सीट बेल्ट ची प्रिंट असलेल टीशर्ट परिधान करा आणि चलन भरण्यापासून वाचा.

पण, मुंबई पोलिसांच्या हे लक्षात येताच त्यांनी अतुल ला त्याच्याच भाषेत खडसावलं. मुंबई पोलिस अतुल ला म्हणाले की, “आमच्या चलनासह आम्ही ते तुमच्यासाठी स्टॉकमध्ये ठेवू. तुमची सुरक्षितता हा काही विनोद नाही! स्टँड अप कॉमेडी म्हणुन याचा वापर करत असाल तर लोकांपर्यंत सुरक्षिततेचा संदेश सुधा पोहचेल याची खात्री करा.”

सीट बेल्ट लावण्याचे फायदे :

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अभ्यासात असं म्हटलंय की मागील सीट बेल्ट घातल्याने मृत्यूचा धोका २५ टक्क्यांपर्यंत कमी होतो.

समोरच्या सीटवर बसलेल्या प्रवाशाला सीटबेल्ट लावल्याने गंभीर दुखापत किंवा मृत्यूचा धोका कमी होतो.

तज्ज्ञांच्या मते सीट बेल्ट आणि एअरबॅग एकमेकांना पूरक आहेत. एअरबॅग्स मऊ कुशनचं काम करतात, तर बेल्ट हालचाल प्रतिबंधित करतो. बेल्टशिवाय एअरबॅग निरुपयोगी आहेत. सीट बेल्ट नसलेल्या एअरबॅग्समुळे गंभीर दुखापत आणि मृत्यूचा धोका जास्त असतो.

एअरबॅग नसलेल्या जुन्या कारमध्येही सीटबेल्टनं जीव वाचवला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधि : केतकी कालेकर