बीड : प्रत्येकाने पर्यावरणाच्या समर्थनासाठी पुढाकार घेतला पाहिजे. झाडांमुळे मिळणाऱ्या शुध्द हवेचे महत्त्व लक्षात घेऊन वृक्षलागवड करून ती जगवायला हवीत. ‘येऊन येऊन येणार कोण? झाडाशिवाय आहेच कोण!’ अशी घोषणा देत चित्रपट सृष्टीतील आघाडीचे अभिनेते सयाजी शिंदे यांनी सह्याद्री देवराई प्रकल्पात वृक्ष संगोपनाची चळवळ गतिमान करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच त्यांनी जानेवारीत शेवटच्या आठवाड्यात महाराष्ट्रातील पहिले वृक्ष संमेलन बीड येथे घेण्याची घोषणाही त्यांनी केली.
बीडजवळील पालवण येथे वनविभागाच्या दोनशे हेक्टर परिसरात मागील काही दिवसांपासून सह्यादी देवराई हा वृक्ष लागवडीचा प्रकल्प आकाराला आला आहे.
अभिनेते सयाजी शिंदे यांनी वृक्ष मित्र आणि नागरिकांच्या पुढाकारातून या ठिकाणी काम सुरू केले आहे. विविध जातीच्या पावणे दोन लाख वृक्षांची या ठिकाणी लागवड करण्यात आली असून काही दिवसात हा ऑक्सिजन झोन तयार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
२१ डिसेंबर रोजी सह्यद्री देवराई प्रकल्पात जाऊन सयाजी शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी शासन आणि लोकसहभागातून प्रयत्न करण्याचा मनोदय व्यक्त केला.












































