नवी दिल्ली, १४ मार्च २०२३ : उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई याने सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे; मात्र संजय राऊत यांनी याचा इन्कार केला आहे. याबाबत आज मंगळवारी (ता. १४ मार्च) दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, मिंधे (दुबळे शिंदे) गट पूर्वी वडिलांना पळवून लावत होता. आता मुलांना पळवू लागले आहेत. भूषण देसाई यांच्या शिवसेना प्रवेशाला भाजपचाही विरोध आहे.
भूषण देसाई यांनी सामाजिक क्षेत्रात एका पैशाचेही योगदान दिले नसल्याचे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. त्यांनी केवळ भ्रष्टाचार केला आहे. अशा भ्रष्टाचारात सहभागी असलेल्या ओळखीच्या व्यक्तीला शिवसेनेत समाविष्ट करून शिंदे गटाने भाजप कार्यकर्त्यांची मने दुखावली असल्याची भावना व्यक्त करीत भाजपचे उपसभापती संदीप जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून तक्रार केली आहे.
संजय राऊत म्हणाले की, भूषण देसाई यांचा शिवसेना किंवा उद्धव ठाकरे यांच्याशी कधीच संबंध नव्हता. त्यामुळे ते कुठेही गेले तरी काही फरक पडत नाही. सुभाष देसाई यांनीही यासंदर्भात आवाहन केले असून, आपल्या मुलाचे याआधी उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेशी कधीच संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.
पुढे खासदार संजय राऊत म्हणाले, ‘त्यांची ही मेगा भरती व्यर्थ आहे. शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी यापूर्वी भूषण देसाई यांच्यावर काही आरोप केले होते. त्याबाबतही त्यांनी चौकशीचे आदेश दिल्याचे सांगण्यात आले. आता त्यांच्या आरोपांचे काय होणार? ते डागही भाजपच्या वॉशिंग पावडरमध्ये धुतले जातील का? तसेच सुभाष देसाई हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचे चिरंजीव शिंदे गटात सामील झाल्यामुळे ठाकरे गटाला काहीही फरक पडणार नाही. कारण ते ठाकरे गटात कधीच नव्हते.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड