गोल पोस्ट महाराष्ट्र पर्यटन, रोजगार आणि उद्योगांसाठी अर्थसंकल्पात मोठी भरारी

पर्यटन, रोजगार आणि उद्योगांसाठी अर्थसंकल्पात मोठी भरारी

नवी दिल्ली १ फेब्रुवारी २०२५ : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत २०२५ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत रोजगार आणि पर्यटन क्षेत्राला चालना देणाऱ्या मोठ्या घोषणा केल्या.

पर्यटन वाढवण्यासाठी सरकारने ५० प्रमुख स्थळे विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सर्व राज्यांचा सहभाग राहणार असून प्रवास, निवास आणि कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी मुद्रा कर्ज दिले जाणार आहे. तसेच, ई-व्हिसाचा विस्तार करून परदेशी पर्यटकांना व्हिसा शुल्क सवलत देण्यात येणार आहे. वैद्यकीय पर्यटनालाही प्रोत्साहन दिले जाईल.

लघु आणि मध्यम उद्योगांसाठी सरकारने विशेष योजना आणली आहे. पहिल्याच वर्षी १० लाख विशेष क्रेडिट कार्ड दिली जाणार असून MSME साठी कर्ज हमी मर्यादा ५ कोटींवरून १० कोटी रुपये करण्यात आली आहे. स्टार्टअप्ससाठी दिल्या जाणाऱ्या कर्जाची मर्यादा २० कोटी रुपये करण्यात आली असून हमी शुल्कात कपात केली जाईल.

रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी ‘पंतप्रधान स्वानिधी’ योजनेची कर्ज मर्यादा ३० हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. खेळणी उद्योगासाठी ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत विशेष योजना जाहीर झाली असून देशाला जागतिक स्तरावरील खेळणी उत्पादन केंद्र बनवण्यासाठी राष्ट्रीय कृती आराखडा तयार केला जाणार आहे.

संशोधन आणि नवोन्मेषाला चालना देण्यासाठी २० हजार कोटींचे भांडवल तरतूद करण्यात आली आहे. यामुळे देशातील रोजगार निर्मिती आणि आर्थिक वाढीला वेग मिळेल, असा विश्वास अर्थमंत्र्यांनी व्यक्त केला.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे

error: Content is protected !!
Exit mobile version