भाजप महायुतीला ५१ टक्के मते मिळतील, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा दावा

नागपूर, १९ ऑगस्ट २०२३ : उद्या निवडणुका झाल्या तरी महायुतीची तयारी आहे, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. ते म्हणाले की, २०२४ पर्यंत राज्यात मोठ्या प्रमाणावर मन आणि मतपरिवर्तन होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला आगामी लोकसभा निवडणुकीत जनतेचा पाठिंबा मिळेल. राज्यात भाजप आणि महायुतीला ५१ टक्के मते मिळतील, असा दावा बावनकुळे यांनी केला आहे.

निवडणुकीतील मतांची टक्केवारीही वाढणार आहे. नेत्यांचा महापूर भाजपकडे येणार असून त्यांना सामावून घेण्याची पक्षात क्षमता आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आणि त्यांचा मुलगा मंत्री असा एक नवा आदर्श निर्माण करून पाहत आहेत. आमदाराचा मुलगा आमदार आणि खासदाराचा मुलगा खासदार होणे ही संस्कृती योग्य नसल्याचे ते म्हणाले. प्रत्येक जिल्ह्यात एक महिला सरचिटणीस असावी, तरुणांना संधी मिळावी आणि त्यांनी राजकारणात उतरून देशासाठी काम करावे, ही पंतप्रधानांची संकल्पना आहे.

बच्चू कडू यांच्या संदर्भात ते म्हणाले की, त्यांना स्वबळावर निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. ते एनडीएमध्ये आहेत. मात्र, त्यांच्या सन्मानासाठी आणि उपायासाठी चर्चा करणार, असे बावनकुळे यांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा