पिंपरी, ११ मे २०२३: वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करुन दंड वसूलीसाठी अधयावत ई-चलन पद्धत सुरू करण्यात आली आहे. ज्यामुळे वाहतूक पोलिसांना रोकड स्वीकारण्यास अडचणी येऊ लागल्या आहेत. याचा परिणाम म्हणजे, वाहतूक विभागातील चिरीमिरीला चाप बसला आहे. मागील काही वर्षांपासून वाहतूकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांकडून ई-चलन प्रणालीद्वारे दंडाची आकारणी केली जात आहे.
वाहतूक पोलीस नियम मोडणाऱ्या वाहनांच्या क्रमांकाचे छायाचित्र काढून ई-प्रणालीत टाकतात. त्या आधारे संबंधित वाहन चालकाला दंडाच्या रकमेचा ‘एसएमएस’ नोंदणी असलेल्या मोबाइलवर जातो. संबंधित वाहन चालकाला त्या दंडाची रक्कम ऑनलाईन किंवा वाहतूक पोलिसांकडील यंत्राद्वारे भरता येते.
यापूर्वी वाहतूक पोलिस वाहन चालकांकडून रक्कम स्वीकारत होते. मात्र यामध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याचे आरोप झाले. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी केवळ ऑनलाईन दंडच घ्यावा, असे आदेश घटक प्रमुखांकडून करण्यात आले. ऑनलाइनच्या वाढत्या वापरामुळे चिरीमिरी घेणाऱ्या वाहतूक पोलिसांची मोठी अडचण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर









































