‘छत्रपती संभाजीनगर’, ‘धाराशीव’ला केंद्राची मंजुरी

नवी दिल्ली, २५ फेब्रुवारी २०२३ : महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांच्या नामांतराला अखेर शुक्रवारी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता औरंगाबादचे नामांतर ‘छत्रपती संभाजीनगर’ तर उस्मानाबादचे नामांतर ‘धाराशीव’ असे असणार आहे.

या निर्णयाची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे दिली आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी! पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री अमितभाई शाह यांचे कोटी-कोटी आभार.

  • शहराचे नाव बदलले की संपूर्ण जिल्ह्याचे? याबाबत संभ्रम

दरम्यान, ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नामांतर औरंगाबाद शहराचे आहे की संपूर्ण जिल्ह्याचे यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे स्पष्टीकरण मागितले असता यावर आता फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी दानवेंचे ट्वीट रिट्वीट करत भूमिका स्पष्ट केली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, अंबादास दानवेंनी आधी पूर्ण प्रक्रिया समजून घ्या. केंद्र सरकारची मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाली की, आधी सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना काढते, तेव्हा शहरांची नावे बदलतात. ही अधिसूचना जारी झाली आहे, त्यानुसार औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामकरण झाले आहे.

महसूल व वन विभाग तसेच नगरविकास विभाग अधिसूचना जारी करेल, तेव्हा संपूर्ण जिल्ह्याचे, तालुक्याचे, महापालिका आणि नगरपालिकेचे सुद्धा नाव बदलेल. दोन्ही जिल्ह्यांसंदर्भात याचीही प्रक्रिया सुरू झाली आहे. आम्ही जेव्हा काही करतो तेव्हा ते पूर्णच करतो. अर्धवट काहीच ठेवत नाही, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा