मोदींच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने नवा भारत घडताना पाहतोय, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य

मुंबई,२९ मे २०२३ : मोदी @ ९ कार्यक्रमांतर्गत आज मुंबईत भाजपची पत्रकार परिषद झाली. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण आदी उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कामाचे भरभरून कौतुक केले आहे. मोदींच्या नेतृत्वात खऱ्या अर्थाने नवा भारत घडताना पाहतोय असे म्हणत, यूपीए सरकारची ओळख लकवा सरकार म्हणून होती, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यानंतर मागील नऊ वर्षांमध्ये अतिशय गतिमान निर्णय प्रक्रिया आणि प्रचंड विकास आपण बघितला. कुठल्याही प्रकारे एक डाग, एक बोट सरकारवर कोणी लावू शकले नाही. भ्रष्टाचार मुक्त व्यवस्था करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून गरीब कल्याणाचा अजेंडा चालवत असताना गरिबांपर्यंत त्यांचे अधिकार आणि योजना पहिल्यांदा पोहोचवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले असल्याचे फडणवीसांनी सांगितले.

महाराष्ट्रात कोरोना लसीकरणाला जास्तीत जास्त लसी पुरवण्याचे काम पंतप्रधान मोदींच्या सरकारने केले. पंतप्रधान आवास योजनेत महाराष्ट्रात २५ लाख घर बांधून झाली असून अजून काम सुरु आहेत. उज्जवला योजनेमुळे अनेक महिलांना फायदा मिळाला. ५ लाख फेरिवाल्यांनाही मोदी सरकारच्या काळात मदत मिळाली. पीएम किसान योजनेमुळे शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार थेट जमा होत आहेत. मुद्रा योजनेमुळे अनेक उद्योजकांना फायदा झाला. अशा अनेक योजनांचा महाराष्ट्रात गरिबांना फायदा झाल्याचे फडणवीस म्हणाले.

२०१४ पासून आज पर्यंत नऊ वर्षांमध्ये आपण केंद्र सरकारच्या माध्यामतून महाराष्ट्रात अनेक विकास कामे केलेली आहेत. एकीकडे विकास आणि दुसरीकडे सामान्य जनतेचं कल्याण असे हे सरकार आहे. पाठीमागील युपीए सरकार आणि आत्ताचे सरकार यातील फरक आपण पाहत आहोत, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा