गोल पोस्ट इतर राजकारण राष्ट्रीय सुरक्षेवर राजकारण करू नये : शरद पवार

राष्ट्रीय सुरक्षेवर राजकारण करू नये : शरद पवार

मुंबई, दि. २८ जून २०२० : भारत आणि चीनमधील तणाव वाढत आहे. भारतात चीनविरूद्धही प्रचंड नाराजी आहे. त्याचवेळी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी चीनच्या मुद्यावर केंद्र सरकारवर सतत हल्ला करत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले आहेत की राष्ट्रीय सुरक्षेवर कोणीही राजकारण करू नये.

राहुल गांधींकडून चीनच्या मुद्दयावरून केंद्र सरकारला सतत घेराव घातला जात आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना १९६२ च्या घटने विषयी जाणीव करून दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले आहेत की १९६२ मध्ये जे घडले ते विसरता येणार नाही. आपल्या ५४००० चौरस किमी क्षेत्रावर चीनने कब्जा केला होता .

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, सध्या चीनने जमीन घेतली आहे की नाही हे मला माहिती नाही, पण या विषयावर बोलताना आपण इतिहास लक्षात ठेवला पाहिजे. तसेच शरद पवार म्हणाले की राष्ट्रीय सुरक्षेवर राजकारण करू नये.१९९३ मध्ये मी संरक्षण मंत्री असताना या परिसरात दोन्ही सैन्यांनी शस्त्रांचा वापर करायचा नाही असा करार केला होता. सध्याच्या परिस्थितीत दोन्ही देशांच्या सैनिकांकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन झालेले नाही. फक्त हाणामारीचे प्रकार घडले आहेत.

याचबरोबर शरद पवार यांनी चीनशी युद्धाची शक्यता नाकारली. शरद पवार म्हणाले की, सध्या चीनशी युद्धाची शक्यता नाही. पण चीनने नक्कीच हिम्मत केली आहे. आपण गलवानमध्ये जो रस्ता बनवित आहोत तो आपल्याच सीमेवर आहे.

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी चीन वादावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सतत निशाणा साधत आहेत. भारतीय लष्कराचे २० सैनिक लडाखच्या गलवान खोऱ्यात शहीद झाले, तेव्हापासून परिस्थिती तणावपूर्ण आहे. त्याच वेळी राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना सांगितले की पंतप्रधानांनी न घाबरता देशाच्या जनतेला सत्य सांगावे, चीनने जमीन घेतली आहे आणि आम्ही कारवाई करणार आहोत. या परिस्थितीत, संपूर्ण देश आपल्या पाठीशी उभा आहे.

राहुल गांधी म्हणाले की, संपूर्ण देश सैन्य आणि सरकारच्या पाठीशी आहे. पण एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे, काही दिवसांपूर्वी पंतप्रधान म्हणाले होते की कोणीही भारतात घुसखोरी केलेली नाही, कोणीही आपली जमीन घेतली नाही. उपग्रह चित्रात दिसत सैन्य दिसत असल्याचे राहुल गांधी म्हणाले, माजी सैन्य लष्कर प्रमुख हे सांगत आहेत आणि लडाखचे लोक म्हणत आहेत की चीनने आपली एका ठिकाणी नाहीतर तीन ठिकाणी जागा ताब्यात घेतल्या आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version