यावेळीही बजेट पेपरलेस असणार, जाणून घ्या किती वाजता सुरू होणार अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचं भाषण

नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी 2022: केंद्रीय अर्थसंकल्प 2022: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन 1 फेब्रुवारी रोजी त्यांचं चौथं अर्थसंकल्पीय भाषण देतील. यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प अशा वेळी सादर केला जात आहे जेव्हा देश कोरोना विषाणू महामारीच्या तिसऱ्या लाटेशी झुंज देत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू झालंय. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करताना केंद्र सरकारने केलेल्या कामांचा उल्लेख केला. गतवर्षीप्रमाणं यंदाही केंद्रीय अर्थसंकल्प पेपरलेस सादर होणार आहे.

2022-2023 चा अर्थसंकल्प कधी सादर होणार?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर करतील. अर्थमंत्री सीतारमन यांचं अर्थसंकल्पीय भाषण सकाळी 11 वाजता सुरू होईल. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला भाग 31 जानेवारी ते 11 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. त्यानंतर, सत्राचा दुसरा भाग सुरू होईपर्यंत सुमारे एक महिन्याचा ब्रेक असंल. यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा भाग 14 मार्चपासून सुरू होईल, जो 8 एप्रिलपर्यंत चालेल.

अर्थसंकल्पीय अधिवेशन कसं चालणार?

संसदेची दोन्ही सभागृहं दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी चालतील. कोरोना महामारीमुळं लोकसभेच्या अधिवेशनाचं कामकाज 2 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी या कालावधीत दुपारी 4 ते 9 वाजेपर्यंत चालेल, तर राज्यसभेचं अधिवेशन दररोज सकाळी 10 वाजता सुरू होईल आणि दुपारी 3 वाजेपर्यंत चालेल. कोरोना महामारीमुळं विविध प्रकारचे कोविड-19 प्रोटोकॉल देखील पाळले जातील.

अर्थसंकल्पीय भाषण किती काळ असंल?

अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांना त्यांच्या दीर्घ अर्थसंकल्पीय भाषणासाठी देखील ओळखलं जातं. 2019 मध्ये त्यांनी 2 तास 15 मिनिटांचं सर्वात मोठे भाषण दिलं. यानंतर 2020 मध्ये त्यांनी 162 मिनिटं भाषण करून स्वतःचाच विक्रम मोडला. अशा परिस्थितीत अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचं यावेळीही अर्थसंकल्पीय भाषण दीर्घकाळ चालणार असल्याचं मानलं जात आहे.

संसदेत आर्थिक आढावा सादर केला
अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी काल संसदेत आर्थिक आढावा मांडण्यात आला. आढाव्यात चालू आर्थिक वर्षाचा विकास दर 9.2 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. पुढील आर्थिक वर्षाच्या संदर्भात अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर 8 ते 8.5 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो, असं सांगण्यात आलं. आगामी काळात या महामारीचा अर्थव्यवस्थेवर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही, असं गृहीत धरून विकास दराचा अंदाज वर्तवण्यात आल्याचं या आढाव्यात सांगण्यात आलं. मोठ्या प्रमाणात लस कव्हरेज, पुरवठा-संबंधित सुधारणांचे फायदे, नियम सुलभ करणं, निर्यातीत भरीव वाढ आणि भांडवली खर्च वाढवण्याची लवचिकता यामुळं विकासाला चालना मिळंल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा