फडणवीस यांनी हजारो कोटींचे घोटाळे केले : अनिल गोटे

मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजारो कोटींचे घोटाळे केले. शिवस्मारकाच्या कामात इतका घोळ केला आहे की, उभ्या महाराष्ट्राने पायताणाने मारलं पाहिजे. शिवाजी महाराजांनाही सोडलं नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल गोटे यांनी केलं आहे.
एक वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली आहे.

यावेळी गोटे म्हणाले की, तत्कालीन फडणवीस सरकारने पाच वर्षांत महाराष्ट्र अक्षरशः ओरबाडून काढला. मी अतिशय जबाबदारीने हे वक्तव्य करत आहे. मी याचे पुरावे सादर करू शकतो. मी पुराव्याशिवाय आणि कागद पत्राशिवाय कधीच बोलत नाही, असंही अनिल गोटे म्हणाले आहेत.
स्वातंत्र्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या इतकं भ्रष्ट सरकार यापूर्वी कधीच सत्तेत आलं नव्हतं, अशी बोचरी टीकाही अनिल गोटेंनी केली आहे. तसेच फडणवीस यांच्या खोटारडेपणाला कंटाळून मी राजीनामा दिला, असा खुलासा त्यांनी केला.
दरम्यान, भाजपचे माजी आमदार असलेले अनिल गोटे यांनी डिसेंबर महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून गोटे फडणवीस यांच्या विरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा