रत्नागिरी, दि.६ मे २०२३ -: वज्रमुठ सभेमध्ये जाहीर केल्याप्रमाणे आज उद्धव ठाकरे राजापूर येथे रिफायनरी प्रकल्पग्रस्तांची संवाद साधण्यासाठी दाखल झाले. त्यांनी सोनगाव येथे शेतकरी आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. बारसू येथील रिफायनरीला विरोध कायम असून ग्रामस्थांच्या भूमिकेला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. कुठल्याही परिस्थिती हा प्रकल्प होऊ देणार नाही. त्याचप्रमाणे येथील शेतकऱ्यांचे आणि ग्रामस्थांचे नुकसान होऊ देणार नाही असे सांगत उद्धव ठाकरे चांगलेच आक्रमक झाले.
मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या बारसू रिफायनरी प्रकल्पा संदर्भात उद्धव ठाकरे ग्रामस्थांची चर्चा करण्यासाठी रत्नागिरी दौऱ्यावर आले आहेत. यावेळी बारसू रिफायनरीच्या संदर्भात स्थानिक ग्रामस्थांच्या भावना जाणून घेत उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली आहे.
आपल्या दौऱ्याच्या सुरुवातीला सोलगाव येथे ठाकरे यांनी ग्रामस्थांशी चर्चा करताना सरकारवर टीका केली. या वेळी बोलताना बारसू येथील प्रकल्प गुजरातला घेऊन जा आणि आमचा गुजरातला गेलेला प्रकल्प आम्हाला परत आणून द्या असे आवाहन करत उद्धव ठाकरे यांनी बारसू येथे रिफायनरी प्रकल्प होणार नाही असे ठणकावून सांगितले.
उद्धव ठाकरे आज रत्नागिरी दौऱ्यामध्ये बारसू, सोलगाव, साखरकुंभे या गावांमध्ये जात असून तेथील ग्रामस्थांच्या भावना ते जाणून घेत आहेत. यानंतर उद्धव ठाकरे यांची महाड येथे जाहीर सभाही होणार आहे. या सभेत उद्धव ठाकरे बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.
न्युज अनकट, प्रतिनिधी – अनिल खळदकर











































