इंदापूर, १३ डिसेंबर २०२०: इंदापूर तालुक्यात रविवारी सकाळपासूनच वातावरण ढगाळ झालं आहे. अवकाळी पावसाचं वातावरण तयार झाल्यानं द्राक्ष उत्पादक डाळिंब उत्पादक आणि अन्य फळ उत्पादक शेतकरी कमालीचे चिंतातुर झाले आहे.
इंदापूर तालुक्यात हजारो हेक्टर वर क्षेत्र हे फळबाग लागवडीखाली आहे. यामध्ये प्रामुख्यानं डाळिंब आणि द्राक्ष या फळांचा समावेश आहे. रविवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाल्यानं फळबाग उत्पादक शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे. आपल्या निर्यातक्षम मालावर कसल्याही प्रकारचा रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी औषध फवारणी सुरू केली आहे. परंतु, अवकाळी पर्जन्य दृश्य हवामान झाल्यानं शेतकरी वर्ग कमालीचा चिंताग्रस्त झाला आहे.
अगोदरच लॉक डाऊन, अतिवृष्टी अशा आस्माने संकटांना सामोरे जात असतानाच हिवाळ्यात पाऊस पडतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एकंदरीत ढगाळ वातावरणामुळं सर्वच शेतकरी चिंताग्रस्त झाल्याचं इंदापूर तालुक्यात पहावयास मिळत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे













































