गांधीजींचा अवमान करणाऱ्या गुणरत्न सदावर्तेंवर देशाद्रोहाचा गुन्हा दाखल करा, काँग्रेसची मागणी

सोलापूर २८ जून २०२३ : अॅड. गुणरत्न सदावर्ते हे मागिल काही दिवसांपासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करत आहेत. सदावर्ते महात्मा गांधी यांच्यावर टीका तर नथुराम गोडसेवर स्तुतीसुमनं उधळताना दिसत आहेत. सदावर्ते यांच्या या वक्तव्यांवर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. सदावर्ते यांच्यावर देशाद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.महात्मा गांधींचा अवमान करणाऱ्या सदावर्ते यांच्यावर देशाद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

नथुराम गोडसजींचा अखंड भारताचा विचार आम्ही संपू देणार नाही. अखंड भारताचे विचार आणि नथुरामजींच्या विचारांच्या कोणी आड येत असेल तर ते सुपूर्द ए खाक केल्याशिवाय राहणार नाही, असे गुणरत्न सदावर्ते म्हणाले होते. यावर आता कुलकर्णी यांनी आक्षेप घेतला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी महात्मा गांधी यांच्यासमोर नतमस्तक होतात. मात्र त्यांच्याच विचारधारेचे गुणरत्न सदावर्ते हे नथुराम गोडसेचे उदातीकरण करतात. नथुराम गोडसे याच्या विचारधारेचे समर्थन करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांच्या डोक्यावर परिणाम झाला, असे काकासाहेब कुलकर्णी म्हणालेत.

सदावर्ते हे मनोरुग्ण आहेत आणि त्यांच्यावर चांगल्या डॉक्टर कडून उपचार करण्याची गरज आहे. गृहमंत्र्यांना आवाहन करतो की तुमचे सदावर्तेंना समर्थन नसेल तर त्यांच्यावर राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल करा. देशातील महापुरुषांची जे लोक बदनामी करतील त्यांना ताबडतोब जेलमध्ये पाठवले पाहिजे, असे काकासाहेब कुलकर्णी म्हणालेत.

न्यूज अन कट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा