काझीगुंड, २७ जानेवारी २०२३ : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेली भारत जोडो यात्रा जम्मू – कश्मीरमधील बनिहाल येथे थांबवण्यात आली. सुरक्षा व्यवस्था अपुरी असल्यामुळे ही यात्रा थांबली आहे.
याबाबत बोलताना राहुल गांधी म्हणाले, यात्रेदरम्यान पोलीस यंत्रणा पूर्णपणे कोलमडली असून सुरक्षेची जबाबदारी सांभाळणारे पोलीस आम्हाला कुठेच दिसत नाहीत. माझे सहकारी चालताना अस्वस्थ झाले आहेत. माझ्या लोकांनी मला प्रवास न करण्याचा सल्ला दिला, म्हणून मी ही पदयात्रा थांबवण्याचा निर्णय घेतला. मात्र, माझे इतर सहकारी अजूनही चालत आहेत
जोपर्यंत आम्हाला सुरक्षा मिळत नाही, तोपर्यंत यात्रेची सुरुवात करणे धोक्याचे ठरू शकते, असे देखील काँग्रेसने म्हटले आहे. दरम्यान, यापूर्वी काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल म्हणाले की, भारत जोडो यात्रेत सुरक्षेमध्ये त्रुटी होती. आम्हाला सुरक्षा मिळत नाही. अशा परिस्थितीत आपण राहुल गांधींना असे पुढे जाऊ देऊ शकत नाही. राहुल गांधींना जायचे असले तरी आम्ही त्यांना पुढे जाऊ देणार नाही, असेही ते म्हणाले.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.












































