मुंबई, ३१ जुलै २०२० : महाराष्ट्राचे सलग १२ वर्षे मुख्यमंत्री राहून राज्याच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या, हरित क्रांतीचे प्रणेते महानायक वसंतरावजी नाईक यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यासाठी, केंद्र शासनाकडे शिफारस करावी, असे निवेदन जय सेवालाल महाराज प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संदीप राठोड यांनी मुख्यमंत्री यांना पाठवले आहे.
माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांनी मुख्यमंत्री पदावर असताना घेतलेले निर्णय, यासोबतच शेती सिंचनाबाबत केलेल्या कामगिरीचा फायदा फक्त राज्यालाच नाही तर संपूर्ण देशाला ही झाला. वसंतरावजी नाईक यांनी महाराष्ट्र राज्य अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण केला. राज्यामध्ये हरितक्रांती घडून आणून शेतीला आधुनिक स्वरूप देण्याकरिता कृषी विद्यापीठाची स्थापना केली.
औष्णिक विद्युत प्रकल्प उभारून विकासाकरिता आवश्यक असणाऱ्या वीज आणि पाणी या मुलभूत गरजांच्या त्यांनी सोयी केल्या. यासोबतच राज्याला सुजलम सुफलम करण्याच्या दिशेने विकासाची गंगा आणून अमलात आणली. असे विकास राष्ट्रपुरुष वसंतरावजी नाईक यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळणे यासंदर्भात केंद्र सरकारकडे शिफारस करावी, असे निवेदन जय सेवालाल महाराज प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संदीप राठोड यांनी मुख्यमंत्री यांना पाठवले आहे.
न्यूजअनकट प्रतिनिधी – प्रगती कराड.