कोकणातील गणेश भक्तांना आनंदाची बातमी, गणेशोत्सव काळात कोकण रेल्वेच्या ५२ विशेष रेल्वे फेऱ्या

मुंबई, ६ जुलै २०२३ : गणेशोत्सव तीन महिन्यांवर येऊन ठेपला आहे. अशातच कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता कोकण रेल्वे मार्गावर आणखी ५२ विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. दिवा-चिपळूण आणि मुंबई-मंगळुरू मार्गावर या विशेष १६ रेल्वेगाड्या धावणार आहेत. यामुळे उत्सवकाळात धावणाऱ्या विशेष रेल्वेगाड्यांची एकूण संख्या २०८ वर पोहोचली आहे. या निर्णयामुळे गणेशोत्सव काळात कोकणवासीयांचा प्रवास सुखकर होण्यास मदत होईल.

दिवा-चिपळूण मेमू (३६ सेवा), १३ ते १९ सप्टेंबर आणि २२ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबरदरम्यान गाडी धावणार आहे. ही गाडी आठ डब्यांची असणार आहे.०११५५ मेमू दिवा स्थानकातून रोज सायंकाळी ७.४५ ला सुटेल आणि चिपळूणला मध्यरात्री १.२५ ला पोहचेल. तर चिपळूणहून दुपारी १ वाजता सुरू होणार असून दिवा स्थानकात ती सायंकाळी ९ वाजता पोहोचणार आहे.गाडीचे थांबे – पनवेल, पेण, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखावटी, कळंबणी बुद्रुक, खेड आणि अंजनी असे आहेत.

मुंबई-मंगळुरू विशेष एक्स्प्रेस (१६ सेवा), ०११६५ ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसहून रात्री १०.१५वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५.४० वाजता मंगळुरू येथे पोहोचेल. तर मंगळूरूवरुन सायंकाळी ६.४० ला सुटणार असून दुसऱ्या दिवशी दुपारी १.३० वाजता एलटीटी येथे पोहोचेल. ही २० डब्यांची गाडी असणार आहे.गाडीचे थांबे- ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव, कारवार, गोकर्ण रोड, कुमटा, मुरुडेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड ब्यंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की, सुरथकल आणि ठोकूर हे असणार आहेत.

कोकण रेल्वे मार्गावर पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात आले आहे. त्यामुळे गाड्यांचा वेग ४० किलोमीटर प्रतितास असेल. पावसाळ्यात प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी ही वेगमर्यादा करण्यात आली आहे. कोकण रेल्वेने मान्सूनसाठी नवे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार सर्वच गाड्यांच्या वेळा बदलल्या आहेत. हे नवे वेळापत्रक १० जून ते ३१ ऑक्‍टोबरसाठी लागू असेल. कोकण रेल्वेने ज्या कालावधीसाठी रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल केला आहे, त्या कालावधीत गणेशोत्सव सुद्धा येतो आहे. त्यामुळे कोकणवासियांसाठी ही बाब महत्त्वाची आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा