ठाण्यात गोविंदांचा उत्साह पावसातही कायम, सकाळपासून गोविंदा पथकांची हजेरी

ठाणे, ७ सप्टेंबर २०२३ : ठाणे शहरात पहाटेपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा गोविंदांच्या उत्साहावर परिणाम झाला नाही. सकाळी नऊ दहा पासूनच गोविंदा पथकांनी शहरातील विविध हंड्यांच्या ठिकाणी हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने आज पहाटेपासून हजेरी लावली, त्यामुळे गोविंदांच्या उत्साहावर पावसाचे विरजण पडते की काय असे वाटत होते.

ठाण्याबरोबरच मुंबईतील गोविंदा पथकांनी ठाण्यातील मोठ्या हंड्यांपुढे थर लावण्यासाठी हजेरी लावली. ठाण्यात यंदाही अकरा थरांचा विश्वविक्रम करण्याचा जय जवान, शिव साई, कोकण नगरच्या पथकांचा मानस आहे. आमदार प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती प्रतिष्ठानच्या तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दही हंडीत हा विश्वविक्रम होण्याची शक्यता आहे.

भगवती मैदानावर होणाऱ्या मनसेच्या हंडीत यापूर्वी अध्यक्ष राज ठाकरे यांनी हजेरी लावली नाही, मात्र आजच्या हंडीत सायंकाळी सहाच्या सुमारास राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासमोरच थरांचा विश्वविक्रम रचला जाणार आहे. शहरात सकाळी दहा वाजल्यापासून बस, दुचाकीवर रंगबेरंगी टी शर्ट घातलेले गोविंदा पथके मुंबईतून आणि ठाण्याच्या विविध भागातून दाखल झाले आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा