जिम आणि मंदिरं अनलॉक- ४ मध्ये उघडणार ?

मुंबई, २७ ऑगस्ट २०२०: २५ मार्च पासून देशभरात व राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आलं होतं. त्यानंतर ते आजपर्यंत जिम व मंदिर बंदच आहेत. अनलॉक एक ते अनलॉक तीन पर्यंत जवळ-जवळ सर्वच गोष्टी सर्वसामान्य करण्यात आल्या आहेत. सर्व उद्योगधंद्यांपासून ते सलून व्यवसाय पर्यंत सर्व गोष्टी आता सुरळीत सुरू करण्यात आल्या आहे. मात्र, असं असलं तरी जिम व देवळांबाबत राज्य सरकारनं कोणताही निर्णय अद्याप घेतलेला नाही.
अजित पवारांपासून ते सुप्रिया सुळे पर्यंत सर्वांनीच जिम उघडण्याबाबत मागणी केली होती. विशेष म्हणजे जिम १५ ऑगस्टपासून सुरु होतील असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं होतं. मात्र, त्यानंतर त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही. पण, आता १ सप्टेंबर पासून अनलॉक ४ सुरू होईल. यामध्ये तरी देऊळ व जिम सुरू केली जातील का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना जिम, मंदिरं यासंबंधी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात निर्णय होऊ शकतो असं सांगितलं आहे.
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारने विरोध केला तरी २ सप्टेंबरपासून राज्यातील मशिदी उघडणार असल्याचं म्हटलं आहे. “आम्ही आमच्या वतीने अल्टिमेटम देत आहोत. १ तारखेला गणपती विसर्जन आहे. हिंदू बांधवांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. १ तारखेपासून सगळी मंदिरं उघडा आणि २ तारखेपासून आम्ही आमच्या सगळ्या मशिदी उघडणार. काही योग्य तर्क असतील तर ऐकू अन्यथा परवानगी दिली नाही तरी २ तारखेपासून सर्व मशिदी उघडू हे सरकारमधील लोकांना मला सांगायचं आहे,” असं आव्हानच इम्तियाज जलील यांनी दिलं आहे. यावेळी त्यांनी याची सुरुवात आपणच औरंगाबादमधून करणार असल्याचंही सांगितलं.
न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा