येणाऱ्या लोकसभेत देशाचे चित्र कसे असेल? विरोधकांना किती संधी? भाजप किती राज्यात? शरद पवार यांचे परखड विधान

औरंगाबाद, ७ जून २०२३ : सध्या राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीचा देशातील मतप्रवाह हा भाजपविरोधी आहे. देशाचा नकाशा समोर ठेवला तर केरळ,तामिळनाडू, कर्नाटका, तेलंगणा, आंध्रात भाजप नाही. गोव्यात आमदार फोडून राज्य आणले. महाराष्ट्र बाजूला ठेवा. गुजरातमध्ये भाजपची सत्ता आहे. हे मान्य करू. मध्यप्रदेशात आमदार फोडून राज्य आणले. यूपीत भाजपची सत्ता आहे. झारखंड, छत्तीसगड, पंजाब, दिल्ली, पश्चिम बंगाल या सर्व ठिकाणी भाजप नाही. भाजप फक्त गुजरात, यूपी आणि आसाममध्ये आहे. म्हणजे राज्याच्या निवडणुकीत लोकांनी बदल करण्याची भूमिका घेतलेली दिसते. हा मतप्रवाह कायम राहिला तर या देशात वेगळे चित्र बघायला मिळेल. हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही, असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले. एकत्र येऊन आपण पर्याय दिला पाहिजे ही विरोधकांची मानसिकता असल्याचे शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

शरद पवार हे औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. विरोधी पक्षातील एकही पक्ष सर्वच्या सर्व जागा का लढवू शकत नाही? या प्रश्नावर ते म्हणाले विरोधी पक्षातील पक्ष सर्व जागा लढवू शकतात. परंतु जागा कशासाठी लढवायच्या? एकमेकांच्या पायात पाय घालून विरोधकांची शक्ती विभाजीत करून सत्ताधाऱ्यांना मदत करणे हे काही शहाणपणाचे नाही. मर्यादित जागा लढवून आपली शक्तीस्थाने आहेत तिथे लक्ष केंद्रीत करता येईल का हे पाहणे राजकीय व्यवहाराचे लक्षण आहे, असेही शरद पवार म्हणाले.

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या पक्षात राष्ट्रवादीचे नेते भगिरथ भालके यांच्यासह राज्यातील अनेक कार्यकर्ते जात आहेत. त्यावरही त्यांनी भाष्य केले. कोण जाते याचा आढावा घेतल्यानंतर चिंता करण्याचे कारण नाही. माझ्या माहितीनुसार जे जात आहेत. त्यांच्याबद्दल फार चिंता करण्याची गरज नाही. वर्ष सहा महिने जाऊ द्या. अनुभव घेतल्यानंतर लोक निष्कर्षाला येतील. चंद्रशेखर राव यांनी जे शेतकऱ्यांना पैशाचे वाटप केले. त्याचा अर्थकारणावर परिणाम काय होईल ते दिसेल. सरकारचा पैसा वाटण्यासाठी घालवायचा की वाटप करण्यावर घालायचा हे पाहावे लागेल, असे पवार म्हणाले

शेतकऱ्यांच्या घरात आज ५०℅ पेक्षा जास्त कापूस आहे. कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती भयंकर आहे. केंद्र आणि राज्य सरकारला त्याची दखल घ्यावी लागेल. दखल नाही घेतली तर शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावं लागेल. त्यासाठी राष्ट्रवादी त्यांच्या पाठीशी उभी राहील, असा इशारा पवारांनी दिला. सध्याच्या सरकारचा दृष्टीकोण शेती आणि शेतकऱ्यांबद्दल पॉझिटिव्ह नाही. कांदाची निर्यात बंदी का करावी. साखरेच्या निर्यातीला मर्यादा दिल्या आहेत. कोटा दिला आहे. दुसरीकडे साखरेच्या किंमती पडत आहेत. हे सर्व शेतकऱ्यांच्या हिताचे नाही, असेही पवार म्हणाले.

या सरकारमधील कोणता मंत्री तुमचा आवडता आहे, यावर शरद पवार यांनी नितीन गडकरी यांचे कौतुक केले. काही लोकांचे काम वादातीत नाही. उदाहरण नितीन गडकरी. विकासाच्या कामात नितीन गडकरी यांचा रस असतो. शासन तुमच्या हातात आल्यानंतर तुम्ही काही तरी रिझल्ट दिला पाहिजे. त्यात गडकरी आहे. गडकरींचे वैशिष्ट्ये म्हणजे ते पक्षीय दृष्टिकोण ठेवत नाही. त्यांच्यासमोर एखादा प्रश्न मांडला तर कोण सांगतो या पेक्षा प्रश्न किती महत्त्वाचा आहे हे ते पाहतात. ही समंजसपणाची गोष्ट आहे. अशा प्रकारचा अनुभव त्यांच्याबद्दलचाच आहे,

१२ जूनला पाटणा येथे होणारी विरोधकांची बैठक पुढे ढकलली आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केले. दोन तीन लोकांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना तारीख बदलायची सूचना केली. त्यांच्या काही कमिटमेंट आहेत, म्हणून त्यांनी विनंती केली. या संदर्भात कालच मला नितीश कुमार यांचा फोन आला होता. तारीख बदलली तर चालेल का? असे त्यांनी मला विचारले. त्यावर मी म्हटले हरकत नाही. सर्वांना सोयीची तारीख ठेवा असे सांगितले आहे. आता २२ किंवा २३ जूनला ही बैठक होणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा