मी लोकसभा निवडणुकीला उभा राहिलो तर पक्षातील सर्व नेते साथ देतील, मनसे नेते वसंत मोरे यांचे मोठे विधान

4

पुणे, ८ जून २०२३ : पुण्यातील भाजप नेते गिरीश बापट यांच्या निधनामुळे पुणे लोकसभा मतदारसंघांची जागा रिक्त झाली आहे. या मतदारसंघात लोकसभेची पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यासाठी भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महाविकास आघाडीतही या निवडणुकीवर चर्चा सुरू आहे. काँग्रेसने ही निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. तर राष्ट्रवादीने पुण्याच्या जागेवर दावा सांगितलेला आहे. असे असतानाच आता मनसेचे नेते वसंत मोरे यांनीही पुणे लोकसभा पोटनिवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी संधी दिल्यास मी लोकसभा निवडणूक शंभर टक्के लढेल, आणि विजयीही होईल असा दावा वसंत मोरे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना केला आहे.

निवडणुकीसाठी मला पक्षाने आदेश दिला तर १०० टक्के निवडणूक लढवेल. केवळ लढवणार नाही तर पुणेकरांच्या जोरावर ही निवडणूक १०० टक्के विजयी सुद्धा होईल. मला त्याची खात्री आहे. माझी पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू आहे. आता निवडणूक लागेल न लागेल काही सांगता येत नाही. परंतु आताची परिस्थिती पाहिली तर निवडणूक लागण्याची शक्यता अधिक आहे. निवडणूक लागली आणि राज ठाकरे यांनी आदेश दिले तर पुण्याची लोकसभा मी नक्की लढवेल, असे वसंत मोरे म्हणाले.

पुण्याची लोकसभा निवडणूक लढवण्याची माझी इच्छा आहे. इच्छा का नसावी? माणसाने स्वप्न पाहिली पाहिजेत. कोरोना काळात मी मोठे काम केले आहे. त्याची पावती म्हणून पुणेकर मला सहकार्य करतील. म्हणून आमच्या पक्षाला संधी मिळाली तर आरोग्य आणि वाहतूक या विषयावर लढू शकतो. राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाली नाही. कारण निवडणूक तळ्यातमळ्यात आहे. पण निवडणूक जाहीर झाली तर राज ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे वसंत मोरे म्हणाले.

पुणे महापालिकेची मागील निवडणूक पाहिली तर मनसेने मध्यमवर्गीय उमेदवार दिले होते. कोणतेही मोठे कार्ड आमच्याकडे नव्हते. पुण्यातील आमचे संपूर्ण मतदान ३ लाख ७९ हजार होते. या मतांचा ग्राफ पाहिला आणि आजची परिस्थिती पाहिली तर आम्ही जिंकू शकतो, असे मला वाटते. गिरीश बापट यांना ६ लाख ३० हजार मतदान होते. काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांना ३ लाख १० हजार मते मिळाली होती. हे सर्व पाहिले तर आता तुल्यबळ उमेदवार सहा आठ महिन्यासाठी निवडणूक लढवण्याचे धाडस करणार नाही. त्यात मतदान किती होईल याची शाश्वती नाही. म्हणून जर मनसे निवडणुकीत उतरली तर आम्ही चमत्कार घडवू शकतो, असा दावाही वसंत मोरे यांनी केला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा