इंडियन मुजाहिदीनच्या नावातही इंडिया, मोदींचा विरोधकांच्या आघाडीवर हल्लाबोल

नवी दिल्ली, २५ जुलै २०२३ : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मणिपूरच्या मुद्द्यावरून मोठा वाद सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आज भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक पार पडली. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या आघाडीवर टीकास्त्र सोडले आहे.

केवळ “इंडिया” नाव ठेवल्यानं काही फरक पडणार नाही. ईस्ट इंडिया कंपनीनेही “इंडिया” नाव लावले होते आणि इंडियन मुजाहिदीनच्या नावातही “इंडिया” आहे. तसेच असा दिशाहीन विरोधी पक्ष आजापर्यंत पाहिलेला नाही, असं मोदी म्हणाले. तसंच विरोधक विखुरलेले आहेत आणि हताश झाले आहेत. त्यांची आणखी बराच काळ सत्तेत येण्याची इच्छा नाहीये, असं त्यांचा दृष्टिकोन पाहून दिसत आहे, हे बोलत मोदींनी विरोधकांवर हल्लबोल केला आहे.

बंगळुरूमध्ये झालेल्या १८ आणि १९ जुलैच्या बैठकीत विरोधकांनी आपल्या आघाडीचं नाव जाहीर केलं. INDIAN NATIONAL DEMOCRATIC INCLUSIVE ALLIANCE अर्थात INDIA. एकप्रकारे भाजपच्या आक्रमक राष्ट्रवादाला उत्तर म्हणूनच विरोधकांनी आपल्या नावात इंडिया आणलं अशी चर्चा होती. तर दुसरी कडे त्याच दिवशी दिल्लीत एनडीएच्या बैठकीनिमित्त भाजपचही मित्रपरिवाराचं शक्तीप्रदर्शन सुरु होतं. बंगळुरुत २६ तर दिल्लीत ३८ पक्ष असल्याचा दावा केला गेला होता. एनडीए विरुद्ध इंडिया अशी लढाई २०२४ ला रंगणार असं चित्र लगेच रंगवलं गेलं पण पंतप्रधान मोदींनी आता पहिला पलटवार केला आहे.

बैठकीत पंतप्रधानांनी आपल्या खासदारांना सल्ला दिला की, विरोधी पक्षांच काम आंदोलन करणं आहे. ते त्यांना करू द्या. आपण आपल्या कामावर लक्ष देऊ या. तिसऱ्या टर्ममध्ये भारताला तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनवायची आहे. विरोधी पक्ष पूर्ण दीशाहीन आहे अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली आहे. तसेच भाजपा नेते रविशंकर प्रसाद हे सुद्धा विरोधी पक्षावर जोरदार टीका करत म्हणाले की, विरोधी पक्षाला जनतेने नाकारल आहे. २०२४ मध्ये पुन्हा भाजपा ची सत्ता येईल. आम्हाला आमच्या पंतप्रधानांवर गर्व आहे. आम्ही २०२४ मध्ये सत्तेत पुन्हा येणार आहोत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना परदेशी नागरिकाने केली होती. आज लोक इंडियन मुजाहिदीन आणि इंडियन पीपुल्स फ्रंटच्या नावाचा वापर करत आहे, असे रविशंकर प्रसाद म्हणाले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे