बांगलादेश विरुद्ध भारत पहिल्या कसोटीत पहिल्या डावात भारत सर्व बाद ४०४; तर बांगलादेश ८ बाद १३३ धावा

पुणे, १५ डिसेंबर २०२२ : भारताने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी ६ बाद २७८ धावांपर्यंत मजल मारली होती. दुसऱ्या दिवशीच्या खेळाच्या सुरवातीलाच बांगला देशने भारताला धक्का दिला. इबादत हुसेनने श्रेयस अय्यरला ८६ धावांवर बाद केले. त्यानंतर आठव्या विकेटसाठी कुलदीप यादव आणि अश्विन यांनी चांगली भागीदारी केली. अश्विनने अर्धशतक पूर्ण केले; पण मेहदी हसन मिराजने अश्विनला यष्टिचीत केले. अश्विनने ५८ धावांची झुंजार खेळी साकारली. त्यानंतर पाठोपाठ भारताला आणखी धक्का बसला. कुलदीप यादवला तैजुल इस्लामने पायचीत केले. कुलदीपने ४० धावा केल्या. सिराजच्या रूपात भारताचा शेवटचा गडी बाद झाला. उमेश यादव १५ धावांवर नाबाद राहिला. पहिल्‍या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात ४०४ धावा केल्या.

दरम्यान, काल पहिल्या दिवशी यजमानांच्या फिरकीने भारतीय फलंदाजांना नाचवले होते. तथापि, चेतेश्वर पुजारा आणि श्रेयस अय्यर या जोडीने टिच्चून फलंदाजी करून भारताची लाज राखली होती. पाहुण्या संघाकडून पुजाराने २०३ चेंडूंत ९० धावा ठोकल्या. पंतने ४५ चेंडूंत ४६ धावा ठोकत उत्तम योगदान दिले. बांगलादेशकडून डावखुरा फिरकी गोलंदाज तैजुल इस्लामने ३, तर मेहदी हसन मिर्झाने २ विकेटस् घेत भारताच्या आघाडीच्या फळीला खिंडार पाडले. पहिल्या दिवसातील अखेरच्या चेंडूवर अक्षर पटेल १४ धावांवर बाद झाला होता.

प्रथम फलंदाजी करणार्‍या भारताची सुरवात खराब झाली होती. शुभमन गिल आणि कर्णधार के. एल. राहुल या सलामीच्या जोडीने ४१ धावांची भागीदारी रचली. मात्र, दोघेही स्थिरावले आहेत असे वाटत असतानाच तैजुल इस्लामने शुभमन गिलला २० धावांवर बाद केले. पाठोपाठ राहुलदेखील खालेद अहमदच्या गोलंदाजीवर २२ धावा करून त्रिफळाबाद झाला. दोन्ही सलामीवीर माघारी परतल्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांच्याकडून डाव सावरण्याची अपेक्षा होती. तैजुल इस्लामने कोहलीला उत्कृष्ट फिरकीवर अवघ्या १ धावेवर पायचित पकडले.

भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा
दरम्यान, बांगलादेशच्‍या पहिल्‍या डावाची सुरवातही अत्‍यंत निराशाजनक झाली. मोहम्‍मद सिराजच्‍या पहिल्‍याच षटकातील पहिल्‍याच चेंडूवर बांगलादेशला धक्‍का बसला. सलामीवीर शान्‍तो याने यष्‍टिरक्षक पंतकडे झोपा झेल दिला. चौथ्‍या षटकामध्‍ये यासिर अली याला त्रिफळाचीत केले. त्‍याने केवळ चार धावांचे योगदान दिले. बांगलादेशने पाच धावांवर दोन गडी गमावले आहेत. मोहम्मद सिराजने बांगलादेशला तिसरा धक्का देत लिटन दासला त्रिफळाचीत केले. सिराजने बांगलादेशला आणखी एक धक्का देत झाकीर हसनची विकेट घेतली. पंतने त्याचा झेल टिपला. झाकीर हसन २० धावा काढून माघारी परतला. यानंतर कर्णधार शाकिब अल हसन हा तीन धावांवर बाद झाला. कुलदीप यादवच्‍या गोलंदाजीवर त्‍याने विराट कोहलीकडे सोपा झेल दिला. भारतीय गोलंदाजांच्‍या भेदक मार्‍यामुळे बांगलादेशचा संघ बॅकफूटवर गेला असून, दुसऱ्या दिवसअखेर बांंगलादेश संघाच्या ८ बाद १३३ धावा झाल्या होत्या.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा