टोकियो, ५ ऑगस्ट २०२१: कुस्तीपटू रवी दहिया याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे चौथे पदक निश्चित केले. त्याने ५७ किलो वजनी गटात उपांत्य फेरीत कझाकिस्तानच्या नुरिस्लाम सनायेवचा पराभव केला. आता अंतिम सामना गुरुवारी होईल, जिथे रवी सुवर्ण किंवा रौप्य पदक साठी लढत देईल.
रवी उपांत्य फेरीत ८ गुणांनी पिछाडीवर होता. असं वाटतं होत की त्याचा पराभव होईल, पण १ मिनिट शिल्लक असताना रवीने कझाक कुस्तीपटूला सामन्यातून बाहेर फेकले. विक्ट्री बाय फॉल रूल द्वारे त्याला विजेता घोषित करण्यात आले. दुसरीकडे, दीपक पुनिया ८६ किलो वजन गटातील उपांत्य फेरीत पराभूत झाला. अमेरिकन पैलवान डेव्हिड मॉरिस टेलरने त्याला एकतर्फी पद्धतीने १०-० ने पराभूत केले. मात्र, दीपकसाठी कांस्यपदकाची आशा कायम आहे.
काय आहे विक्ट्री बाय फॉल रूल
रवीने कझाक पैलवानाला चित करून सामना जिंकला. आंतरराष्ट्रीय कुस्तीमध्ये याला व्हिक्टरी बाय फॉल असे म्हणतात. जेव्हा एखादा पैलवान प्रतिस्पर्ध्याला चित करतो आणि त्याचे दोन्ही खांदे मॅटवर ठेवतो, तेव्हा त्याला विक्ट्री बाय फॉल रूल म्हणतात. ऑलिम्पिक स्तरावर विशेषतः उपांत्य फेरीत असे विजय दुर्मिळ असतात. रवीने नूर इस्लामला चित केले तेव्हा तो ७-९ ने मागे होता. अधिकृत स्कोअर ७-९ राहिला परंतु प्रतिस्पर्ध्याला चित केल्याने त्याला त्वरित विजय मिळाला.
महिला कुस्तीमध्ये अंशु कडून अपेक्षा
महिलांच्या गटात अंशु मलिकला उपांत्यपूर्व फेरीत बल्गेरियाच्या इरियाना कुराचकिनाकडून पराभव पत्करावा लागला. कुराचकिनाने उपांत्य फेरी गाठली आहे. जर तिने अंतिम फेरी गाठली तर अंशु रेपेचेज फेरीत प्रवेश करेल जिथे तिला कांस्य पदक जिंकण्याची संधी असेल. कुस्तीमध्ये, अंतिम फेरी गाठणारे पैलवान त्यांनी पराभूत केलेल्या विरोधकांमध्ये कांस्य पदकासाठी स्पर्धा करतात. याला रिपेचेज फेरी म्हणतात.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे