बंगलोर, २९ जून २०२१: भारतीय अवकाश संशोधन संस्था (इसरो) साठी कदाचित वेळ प्रतिकूल असू शकेल, परंतु यावर्षी डिसेंबरमध्ये प्रथम मानवरहित मोहीम सुरू करण्याची तयारी सातत्यानं सुरू आहे. हे अभियान मानवांना अंतराळात पाठवण्याच्या तयारीचा एक भाग आहे. तथापि, कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी लावलेल्या लॉकडाऊनमुळं उपकरणांच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.
मानवांना अंतराळात पाठविण्याच्या गगनयान कार्यक्रमापूर्वी इस्रो दोन मानवरहित उड्डाणं अंतराळात पाठवेल. बंगलोरस्थित अंतराळ संस्थेच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की कोरोना साथीमुळं गगनयान कार्यक्रमा वर वाईट परिणाम झालाय. या अभियानाची उपकरणं उद्योगांकडून उत्पादित केली जात आहेत. परंतु देशाच्या विविध भागात वेगवेगळ्या वेळी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळं त्यांच्या पुरवठ्यावर विपरित परिणाम झालाय.
अधिकाऱ्यानं सांगितलं की डिझाइन, विश्लेषण आणि कागदपत्रं संबंधी काम इस्त्रोनं केली आहेत, तर गगनयानची उपकरणं देशातील शेकडो उद्योगांद्वारे तयार केली जात आहेत. गगनयान कार्यक्रमाचं उद्दीष्ट म्हणजे भारतीय अंतराळ यानामार्फत मानवांना पृथ्वीच्या खालच्या कक्षेत पाठविणं आणि नंतर त्यांना सुखरूप पृथ्वीवर परत आणणं ही क्षमता दर्शविणं.
केंद्रीय अवकाश राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी यावर्षी फेब्रुवारी महिन्यात सांगितलं होतं की डिसेंबर २०२१ मध्ये प्रथम मानव रहित मिशन पाठविण्याचं नियोजन आहे. यानंतर दुसरी मानवरहित मोहीम पाठविली जाईल आणि त्यानंतर मानवनिर्मित अंतराळ मोहीम राबविली जाईल. या मोहिमेसाठी चार भारतीय अंतराळवीरांनी आधीच रशियामध्ये कठोर प्रशिक्षण घेतलंय.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे










































