मुंबई: शिवसेनेचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आज राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. खासदार संजय राऊत यांना याबाबत विचारलं असता त्यांनी थेट सरकारकडं बोट दाखवलं. ‘सत्तारांनी राजीनामा का दिला, मला माहीत नाही. जे सरकार चालवत आहे त्यांना हे माहीत. असं ते म्हणाले. ‘खातेवाटप हा काही मोठा गंभीर विषय नाही. त्यासाठी इतका वेळ लागणं चुकीचं आहे. ‘तारीख पे तारीख’ देणं हे काही बरोबर नाही,’ असं मत राऊत यांनी व्यक्त केलं आहे.
या वर बोलताना पुढे ते म्हणाले की, ‘खातेवाटपाला उशीर होतोय हे खरं आहे. हे असं का होतंय काही कळायला मार्ग नाही. याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीच सांगू शकतील. अलीकडंच चार ते पाच तास मॅरेथॉन बैठका झाल्या. खरंतर हा अर्ध्या तासाचा विषय आहे. तरीही उशीर का होतोय कळत नाही,’ असं राऊत म्हणाले.