निलेश राणे यांच्यावर प्राणघातक हल्ल्याचा जाधवांचा पूर्वनियोजित कट – केदार साठे

रत्नागिरी, २१ फेब्रुवारी २०२४ : भाजपा नेते निलेश राणे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा आमदार भास्कर जाधव यांचा पूर्वनियोजित कट होता असा गंभीर आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी केला आहे. सदर घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषद घेतली या हल्ल्याचा पोलिसांनी सखोल तपास करण्याची मागणी करताना याची संपूर्ण माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

साठे पुढे म्हणाले की, आमदार जाधव यांनी कणकवलीत राणे कुटुंबावर खालच्या थराला जाऊन टीका केली. त्यामुळे त्याला गुहागर शृंगार तळी येथील सभेत उत्तर देणार असे निलेश राणे यांनी काही दिवस अगोदरच जाहीर केले होते. त्यानुसार चिपळूण स्वागत होणार असल्याचेही सर्वांना माहीत होते. असे असताना गुहागर मधील सभा मोठी होणार याची कल्पना आमदार जाधव यांना आल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यामुळेच त्यांनी निलेश राणे यांना येथेच कसे गुंतवून ठेवता येईल त्याचा प्लॅन तयार करून त्यांच्यावर प्राणघात हल्ला करण्याचा कट रचला होता. त्यांच्या कार्यालयाजवळ ठेवण्यात आलेल्या शिका, दगड इमारतींच्या टेरेसवर ठेवलेले दगड यामुळे हे सारे पूर्वनियोजित होते हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे पोलिसांनी याचा सखोल तपास करीत असे सूत्रधार असलेल्या आमदार जाधव यांच्यावर कारवाई करण्याची आमची मागणी असल्याचे यावेळी केदार साठे यांनी स्पष्ट केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : केतन पिलणकर