पुणे, २१ जुलै २०२२: २१ जुलै २०२२ : काल भावाचा फोन आला आणि तो म्हणाला की आई-बाबांच्या लग्नाचा ५० वा वाढदिवस आपल्याला साजरा करायचा आहे. मनात विचार आला, आपल्या आधीची पिढी आणि आपण यांच्यात किती फरक आहे. आपण नवरा- बायको म्हणून सतत भांडत रहातो. या-ना त्या कारणावरुन घटस्फोटाची भाषा बोलतो. हेच सध्याचे चित्र आहे. सध्याच्या तरुण पिढीत दिसणारी ही खेददायक गोष्ट आहे.
केवळ पुण्यातच सध्या ३३ टक्के घटस्फोटाच्या केसेस पेंडिग आहेत. पण यामुळे विवाह टिकवणे या संज्ञेवर प्रकाशझोत टाकणे आवश्यक आहे.
१. विवाह ही संकल्पना अतिशय रम्य आणि नाजूक आहे. जिचा आधुनिकतेच्या नावावर केवळ मजाक उडवला जात आहे. ज्याचा परिणाम नातेसंबंध तुटताना दिसत आहे. यासाठी नातेसंबंधाना जपा.
२. नवरा-बायको दोघांना समान पातळीवर समजून घ्या. मी वरचढ का तु वरचढ, अशा चढाओढीत यात नात्यांना दृष्ट लागते, ज्याचे रुपांतर भांडणात होते.
३. वैवाहिक आयुष्याला दोघांनी एकमेकांना वेळ देऊन संवाद साधणे गरजेचे आहे. सध्या कामाच्या दगदगीत एकमेकांना वेळ द्यायला जमत नाही. ज्यामुळे गैरसमजांना भरपूर वाव मिळतो.
४. आठवड्यातला एक दिवस हा केवळ दोघांसाठी ठेवा. मानसिक आणि शारिरीक दोन्ही पातळीवर एकमेकांचे होण्याचा प्रयत्न करा.
५. कुठल्याही गोष्टी एकमेकांपासून लपवून ठेवू नका.
६. नवरा-बायको दोघांचे आईवडिल तेवढेच महत्त्वाचे आहे. दोघांना वाढवण्यासाठी त्यांनी तेवढ्याच खस्ता खाल्ल्या आहेत. तेव्हा कधीतरी सगळे मिळून एकत्र फिरायला जाणे किंवा गेट टूगेदर करुन आनंदात वेळ घालवा.
७. विवाह या संकल्पनेवर सध्या लिव्हिंग रिलेशनशीप हा पर्याय आता कायद्याने निर्माण केला आहे. पण या पर्यायात धोका असून जिथे कुठलीही गोष्ट ठोस नाही. त्यामुळे या पर्यायाचा विचार करताना शंभरवेळा सर्व बाजूंचा विचार करा.
८. सध्या पुरुषांपेक्षा बायका या अतिशय वरचढ प्रमाणात असल्याचं दर्शवतात. कपडे, शिक्षण आणि राहणीमान यातून पुरुषाला स्पर्धा देण्यासाठी त्या झटत आहे. पण शेवटी कुठेतरी स्त्रियांना मर्यादा आहेत. या त्यांनी लक्षात घेणं आणि पत्नी म्हणून तिला मान देणं, ही दोन्ही कर्तव्य पुरुषांनी पार पाडणं गरजेचं आहे.
अनुरुप विवाह संस्थेच्या सर्वेसर्वा गौरी कानटकर यांनी एक विधान केले, जे अतिशय गंभीरपणे घेण्याची काळाची गरज आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की विवाहसंस्था ही कालांतराने कालबाह्य होणार आहे. जिथे विवाह हा संस्कार मानला जातो, तिथे विवाह संस्थाच संपुष्टात येते, हे भारतीय संस्कृतीचे दुर्देव म्हणावे लागेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस















































