गोल पोस्ट इतर राजकारण विरोधकांच्या बैठकीपूर्वी केजरीवालांचे विरोधी पक्षांना पत्र

विरोधकांच्या बैठकीपूर्वी केजरीवालांचे विरोधी पक्षांना पत्र

नवी दिल्ली २१ जून २०२३: केंद्रातील मोदी सरकार विरोधात एकजूटीची हाक देत, बिहारची राजधानी पाटण्यात गुरुवारी विरोधी पक्ष नेत्यांची बैठक बोलवण्यात आलीय. बैठकीपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विरोधी पक्षांना पत्र लिहिले आहे. दिल्ली संदर्भात केंद्राने आणलेल्या वटहुकूमाला संसदेत घेरण्याच्या रणनीतीवर या बैठकीत सर्वात आधी चर्चा व्हावी, अशी विनंती पत्रातून करण्यात आलीय.

केंद्राचा वटहुकूम पारित झाला तर दिल्लीतील लोकशाही संपुष्टात येईल, नायब राज्यपालांच्या माध्यमातून केंद्राकडून राज्य सरकार चालवले जाईल तसेच दिल्लीनंतर इतर राज्यांमधील लोकशाहीपण धोक्यात येईल, असा दावा केजरीवालांनी केला आहे. पंतप्रधान ३३ राज्यपाल तसेच उपराज्यपालांच्या माध्यमातून सर्व राज्यांचा कारभार हाती घेतील, हा दिवस दूर नाही, अशी भीती देखील या पत्रातून व्यक्त करण्यात आलीय.

केजरीवालांच्या या भुमिकेमुळे विरोधकांच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीतून संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्राला घेरण्याची रणनीती आखली जाणार का? असे प्रश्न उपस्थित होतायत. केंद्राच्या वटहुकूमा विरोधात काँग्रेस वगळता आम आदमी पक्षाला अनेक विरोधी पक्षांचे पाठबळ मिळाले आहे. शिवसेना उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारत राष्ट्र समिती, तृणमूल काँग्रेस, जनता दल, राष्ट्रीय जनता दलाने या प्रकरणी आप ला समर्थन दिले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी- अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version