मुंबई, दि. २३ मे २०२०: कोरोनाच्या काळात वैद्यकीय आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत देखील खासगी रुग्णालयात रुग्णांची पैशासाठी पिळवणूक करत आहेत. रुग्णांच्या आणि नागरिकांच्या वाढणाऱ्या तक्रारी पाहून सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या संकटात खासगी रुग्णालयातल्या ८० टक्के खाटा राज्य सरकार ताब्यात घेणार आहे. आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांनी तसं परिपत्रक प्रसिद्ध केलं आहे.
या संकटाच्या काळात खासगी रुग्णांनी सहकार्य करावे असे सरकारने सांगितले होते. परंतू याउलट खासगी रुग्णालय नागरिकांना लुटण्याचे काम करत असल्याने सरकारला हा कठोर निर्णय घ्यावा लागला आहे. रुग्णांची लूट थांबवण्यासाठी खासगी रुग्णालयांना शुल्कदर निश्चित करुन देण्यात आले आहे.
३१ ऑगस्टपर्यंत राज्य सरकारकडे हा ताबा असणार आहे. याशिवाय राज्य सरकारने उपचार खर्चाची मर्यादाही ठरवून दिली आहे. सरकारने ठरवलेल्या दरांमध्ये औषधे, डॉक्टर, परिचारिका यांची फी, जेवण आणि खाटेचे भाडे यांचा समावेश आहे. कोविड चाचणी, पीपीई किट, एमआरआय, सीटी स्कॅन आणि काही महागड्या औषधांचे वेगळे पैसे आकारले जातील. यापूर्वी खासगी रुग्णालयांत व्हेंटिलेटर वापरणाऱ्या कोव्हिड-१९ च्या रुग्णांकडून ४० ते ५० हजार रुपये घेतले जात होते. नव्या दरांमुळे खर्च साधारणत: ८२ टक्के खर्च कमी होणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी













































