तंबाखू दिली नाही म्हणून मित्राला मारले ठार

पुरंदर, दि. २१ ऑक्टोबर २०२०: पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे एकाने किरकोळ कारणावरून आपल्या मित्राचा खून केला आहे. मित्राने तंबाखू दिली नाही याचा राग आल्याने त्याच्या डोक्यात विट मारून खून करण्यात आला आहे. खून करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,दत्ता दिगंबर ठोंबरे व त्याचा मित्र सागर बापू शिंदे (वय २९ रा.कुपावडा जी.सांगली) हे दोघे जेजुरी येथे बिगारी काम करीत होते. त्या दोघांमध्ये चांगली मैत्री होती.काल सायंकाळी कामावरुन आल्यानंतर दोघे एकत्र बसले होते. दत्ताने सागरला तंबाखू मागितली.

परंतु त्याने तंबाखू देण्यास नकार दिला. यावरून त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यामुळे चिडलेल्या दत्ताने जवळ पडलेली वीट उचलून सागरच्या डोक्यात मारली. त्यामुळे सागर गंभीर जखमी झाला. यातच सागरचा मृत्यू झाला. याप्रकरणी दत्ता दिगंबर ठोंबरे याला जेजुरी पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस कर्मचारी देवेंद्र खाडे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. जेजुरी पोलिस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक अंकुश माने या बाबतचा तपास करीत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा