कृषी समित्यांवरील उपाय योजनांसाठी समिती गठीत: बाळासाहेब पाटील

मुंबई, दि.१ जून २०२०: कोविड -१९ विषाणुच्या प्रादुर्भावामुळे जाहीर झालेल्या लॉकडाऊन कालावधीत राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांवर झालेले दूरगामी परिणाम आणि येणाऱ्या अडचणी यावर उपाययोजना करण्यासाठी शासनाने एक समिती गठीत केली आहे, अशी माहिती पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

लॉकडाऊनच्या कालावधीत संपुर्ण देशात सामाजिक व आर्थिक जनजीवन विस्कळित झाले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने अनेक उपाययोजना केल्या आहेत. कृषि शेतमालाच्या विक्री व्यवस्थेत कृषि उत्पन्न बाजार समित्यांचे महत्वाचे योगदान आहे त्यांना अधिक बळकट करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर कोविड -१९ विषाणुच्या प्रादुर्भावामुळे जाहीर झालेल्या लॉकडाऊनचे दुरगामी परिणाम आणि त्यावर करावयाच्या उपाययोजना याबाबत समिती गठीत करण्यात आली आहे.

या समितीने बाजार समित्यांवर झालेले परिणाम आणि करावयाच्या उपाययोजना याचा अभ्यास करून दोन महिन्यांच्या आत अहवाल शासनाला सादर करावा असे पाटील यांनी संगितले आहे.

पणन संचालक सुनिल पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करण्यात आली आहे.

या समितीमध्ये पणन संचालनालयाचे सहसंचालक विनायक कोकरे, हे सदस्य सचिव आहेत तर ए.के. चव्हाण, सचिव कृषि उत्पन्न बाजार समिती मुंबई, बी.जे.देशमुख, प्रशासक कृषि उत्पन्न बाजार समिती पुणे, कृषि उत्पन्न बाजार समिती लातूरचे सभापती ललित शहा, कृषि उत्पन्न बाजार समिती हिंगणघाटचे सभापती सुधीर कोठारी, कृषि उत्पन्न बाजार समिती जळगावचे सभापती कैलास चौधरी, कृषि उत्पन्न बाजार समिती बारामतीचे सचिव अरविंद जगताप, कार्यकारी संचालक, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे हे या समितीचे सदस्य आहेत असेही पाटील यांनी संगितले.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा