मुंबई, दि.१८ मे २०२०: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह ८ जणांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड करण्यात आली आहे. आज(सोमवारी) दुपारी १ वाजता त्यांचा शपथविधी पार पडणार आहे.
या नव्याने निवडून आलेल्या ९ सदस्यांमध्ये शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि डॉ. निलम गोर्हे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अमोल मिटकरी आणि शशिकांत शिंदे, काँग्रेस पक्षाचे राजीव राठोड तर भाजपाच्या प्रवीण दटके, रमेश कराड, रणजितसिंह मोहिते-पाटील, गोपीचंद पडाळकर यांची चार उमेदवारांचा समावेश आहे.
सध्या राज्यात कोरोनाचे मोठे संकट असून त्या पार्श्वभूमीवर विधान परिषद निवडणूका घेण्याबाबत दुमत होते. मात्र उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद अबाधित ठेवण्यासाठी त्यांची विधिमंडळात निवड होणे गरजेचे होते. यामुळे त्यांचा आमदारकीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
याअगोदर विधान परिषद निवडणूका २१ मे रोजी घेण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वच पक्षांनी एकजूट दाखवल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आमदारकीचा मार्गही मोकळा झाला आहे. आता काही वेळात हे सर्व नऊ सदस्य शपथ ग्रहण करणार आहे.अशी माहिती समोर आली आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: