कोरोनारुपी रावणाचा नाश करूया: उद्धव ठाकरेंचे जनतेला संबोधन

मुंबई, २५ ऑक्टोंबर २०२०: यंदा कोरोनाचे सावट असताना अनेक क्षण आले व तसेच निघून गेले. या दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित करत सन साध्या पद्धतीने साजरा करण्याचे वेळोवेळी आव्हान देखील केले. आज दसरा आहे, याच पार्श्वभूमीवर काल उद्धव ठाकरेंनी दसऱ्यानिमित्त राज्यातील जनतेला संबोधित केले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, विजयादशमी म्हणजे संकटावर, वाईट प्रवृत्तीवर विजय मिळवण्याची प्रेरणा. यंदाच्या या विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या उत्सवातून सीमोल्लंघन करून विजय खेचून आणण्याची प्रेरणा घेऊन आपण एकजुटीने कोरोना विषाणूरूपी रावणाचा नाश करू या. कोरोना संकटावर मात करून महाराष्ट्र नव्या जोमाने भरभराट आणि समृद्धीकडे वाटचाल करेल, असा विश्वासही यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

पुढे ते म्हणाले की, लढवय्या महाराष्ट्र अशी आपली ओळख आहे. आपण अनेकदा संकटांचा यशस्वी मुकाबला केला आहे. त्यामुळे कोरोना विषाणुच्या विरोधातील लढ्यातही आपण सर्व भेद बाजुला ठेवून एकवटले आहोत. कोरोनाच्या संकटातच निसर्गाची अवकृपा झाली. पण या सगळ्या संकटांना न डगडगमता सामोरे जात आहोत. कोरोनाच्या विषाणूला पराजीत करण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम राबवत आहोत.

यावेळी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जनतेने काय खबरदारी घ्यावी, तसेच आवश्यक नियमांची आठवण करून देत ते म्हणाले की, घराघरापर्यंत पोहचून विषाणूचाच पाठलाग करून, त्याला रोखण्याचा आपले कोरोना योद्धा प्रय़त्न करत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी सगळ्यांनीच खूप संयम दाखवला आहे. सर्वच धर्मींयानी आपले सण, उत्सव घरीच साजरे केले आहेत. उद्या विजयादशमी अर्थात दसऱ्याचा उत्सव साजरा करणार आहोत. दसरा संकटावर, वाईट प्रवृत्तीवर मात करण्यासाठी सीमोल्लंघन करून विजय खेचून आणण्याची प्रेरणा देतो. त्यामुळे आपल्याला दसरा उत्साहात साजरा करतानाच विषाणुच्या समूळ उच्चाटनासाठी आरोग्य दक्षतेचे गर्दी न करण्याचे – शारिरीक अंतर राखण्याचे, मास्क वापरण्याचे, वारंवार हात धुण्याच्या सूचनेचे पालन करावे लागेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा