नागपूर, ३१ मे २०२३: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात धमकीचा फोन करून १०० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करणारा आरोपी जयेश उर्फ शाकीर पुजारीला नागपूर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. दरम्यान माझी या प्रकरणी नागपूरातील चौकशी पूर्ण झाली आहे. त्यामुळे आपल्याला पुन्हा बेळगाव कारागृहात पाठविण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका जयेश पुजारी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली आहे.
पुजारीच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने कारागृह प्रशासन आणि पोलिस यांना नोटीसा बजावून दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. कर्नाटकमधील दोन खटल्याची सुनावणी आणि आपण गरीब असून पत्नी आणि दोन मुलं तिकडे असल्याचे कारण त्यांने यासाठी दिले आहे. नागपूरच्या कारागृहात आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा त्याने केला आहे. मुळात बेळगावात मिळणाऱ्या सुविधा त्याला नागपूर कारागृहात मिळत नसल्याने त्यांनी ही मागणी केली आहे. असा पोलिसांचा दावा आहे.
एनआयएने मागच्याच आठवड्यात जयेश पुजारीची चौकशी केली. जयेश हा बेळगाव कारागृहात असलेल्या दहशतवादी संघटनांचे म्होरके अकबर पाशा, कॅप्टन नसीर आणि फहद कोया रशिद मालबारी यांच्या संपर्कात होता. त्यांच्याच सांगण्यावरूनच नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात तो धमकीचे फोन करीत होता. त्यांचे संबंध पीएफआयशी असल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध युएपीए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर