महाराष्ट्र कृषी दिन विशेष

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्मदिन महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती आणण्यामध्ये वसंतराव नाईक यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे त्यांच्या जन्मदिनी महाराष्ट्रात कृषी दिन साजरा केला जातो. आजही महाराष्ट्रात शेतकर्‍यांची स्थिती बिकट आहे. देशाचा अन्नदाता असणार्‍या शेतकर्‍यावर बिकट संकट असल्याने अनेकजण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. मात्र आजच्या ‘कृषी दिना’पासून प्रत्येकाने शेतकर्‍याप्रती आपलं असलेले सामाजिक भान लक्षात घेता बिकट काळात शेतकर्‍याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून त्यांना साथ देणं गरजेचे आहे.

भारत हा कृषी प्रधान देश असून शेती हेच उपजीविकेचे मुख्य साधन आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा देशपातळीवर मोठा आहे. मात्र, सद्यस्‍थितीला दुष्काळ, अतिवृष्टी, वातावरणातील बदल, दिवसेंदिवस घटत चालेली पाणी पातळी आणि सरकाची शेतीविषयी असलेली आनास्‍था ही आजच्या शेतीपुढली मोठी आव्हाने आहेत. या आव्हानांचा सामना करतच येथील शेतकरी देशाला कृषी प्रधान करत आहे. समोर कितीही मोठे प्रश्न असले तरी बळीराजा वर्षभरातील सण उत्‍सव आणि विविध दिवस साजरे करत असतो. त्‍याचप्रमाणे आज संपूर्ण महाराष्‍ट्रात ‘कृषी दिन’ साजरा होत आहे.

महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झाल्यानंतर मंत्रालयात पेढे वाटून शेती उत्सव सुरू करणारे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जन्म दिनी १ जुलै हा कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. वसंतराव फुलसिंग नाईक हे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातले अनन्‍यसाधारण नाव. वसंतराव नाईक यांची कृषीतज्ज्ञ म्हणून ख्याती होती आणि आहे. त्‍यांचा जन्म (१ जुलै १९१३) रोजी विदर्भातील गहूली येथे शेतकरी कुटुंबात झाला. कृषी घराण्याचा वारसा जपत नाईक यांनी राज्यातील कृषी समस्यांकडे विशेष लक्ष दिले. देशात आपले राज्य धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करणे हा मुख्य उद्देश त्यांनी डोळ्यासमोर ठेवला आणि तशा हालचालीही केल्या. दोन वर्षांत महाराष्ट्र स्वयंपूर्ण झाला नाही तर मी स्वतः फाशी जाईन असे १९६५ मध्ये निक्षून सांगणाऱ्या वसंतराव यांनी राज्याला शेतीप्रधान म्हणून ओळख मिळवून दिली.

कृषी उत्पन्न वाढीसाठी केंद्र आणि राज्य सरकारतर्फे अनेक प्रकारच्या योजना राबविली जातात. परंतु, त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाहीत. त्यामुळे विविध योजना शेतकऱ्यांना माहित होण्यासाठी सरकारकडून सर्वोतेपरी प्रयत्न होणे अगत्याचे आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे