महाराष्ट्र-कर्नाटक वादाचे लोकसभेत पडसाद; सुप्रिया सुळे आक्रमक

नवी दिल्ली, ७ डिसेंबर २०२२ :महाराष्ट्र कर्नाटक वादाचे पडसाद आज लोकसभेत उमटलेले पाहायला मिळाले. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी लोकसभेत कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा मुद्दा उपस्थित केला आहे. महाराष्ट्राच्या खासदारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने लोकसभेत गदारोळ झाला.

  • महाराष्ट्राविरोधात षडयंत्र सुरु

सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत म्हटले की, मागील दहा दिवसांपासून महाराष्ट्रात वेगळा मुद्दा चर्चेला येत आहे. शेजारील राज्य कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून बेताल वक्तव्य करण्यात येत आहे. काल महाराष्ट्रातील लोकांना कर्नाटक सीमेवर जायचे होते पण त्यांना मारहाण करण्यात आली. गेल्या १० दिवसांपासून महाराष्ट्राविरोधात षडयंत्र सुरु आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे तुकडे करण्याचे बोलत आहेत. दोन्ही राज्ये भाजपशासित आहेत. महाराष्ट्राच्या नागरिकांना झालेल्या मारहाण सहन करणार नाही. हे सगळे योग्य नाही असेही त्या म्हणाल्या. तसेच हा एक देश आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी या मुद्द्यावर बोलावे, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

  • कर्नाटक सरकारकडून सुरू असलेल्या अत्याचाराचा धिक्कार

तर ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेतला कर्नाटक सरकारच्या भूमिकेवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न हा सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. कर्नाटक सरकारकडून मराठी भाषिकांवर अत्याचार, दडपशाही सुरु आहे. एका राज्याच्या मंत्र्यांना प्रवेश करण्यास मनाई केली जाते. अशी बंदी घालणारे कर्नाटक हे पहिले राज्य असून कर्नाटक सरकारकडून सुरू असलेल्या अत्याचाराचा धिक्कार करत असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा