महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ‘एक सही संतापाची’ उपक्रम सुरु, मुंबईत अमित ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ तर पुणे पंढरपूरातही उपक्रम सुरू

पुणे, ८ जुलै २०२३ : महाराष्ट्रातील राजकारणात २०१९ पासून अनेक बदल होत आहे. २०१९ मध्ये भाजप-शिवसेना युतीने एकत्र निवडणूक लढवल्या. भाजप आणि शिवसेना युतीला बहुमतही मिळाले. परंतु सरकार आले महाविकास आघाडीचे. शिवसेनेने भाजपला सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केले. त्यानंतर एक वर्षा पूर्वी शिवसेनेतून एकनाथ शिंदे गट वेगळा झाला. ४० आमदारांना बरोबर घेऊन बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे यांनाच शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळाले. आता राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार गट बाहेर पडला. त्यांनीही आपणास ४० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. राज्यात आता शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी असे सरकार सत्तेवर आले आहे.

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी नंतर अजित पवार सत्तेत सामील झाले. यावर प्रतिक्रिया देताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले होते की, राज्यातील राजकारणाचा चिखल झाला आहे, लोकांनी याचा विचार करायला हवा. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ‘एक सही संतापाची’ हा उपक्रम सुरु केला आहे. मुंबई, पुणे आणि पंढरपूर शहरात मनसेने सह्यांची मोहीम सुरु केली आहे. मतदारांच्या मताला विचारात घेतले जात नाही, एका चिन्हावर निवडून येतात आणि दुसरीकडे जाताय, आम्ही आमचा संताप सहीतून व्यक्त करतोय, असा हा उपक्रम आहे. मुंबईत मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. तर पुण्यात मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी या उपक्रमास सुरुवात केली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ‘एक सही संतापाची’ या उपक्रमाचा प्रारंभ सोलापूर जिल्ह्यातही झाला. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपुरातून या मोहिमेला सुरुवात झाली. मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या उपस्थितीत मोहिमेला प्रारंभ झाला आहे. राजकारणाचा चिखल झाला आहे का? माझ्या मताला काही किंमत नाही का? एकदा मतदान केले की तुम्हाला पाच वर्षे गृहीत धरणार का? या घटनांचा तुम्हाला राग येत नाही का? यासह विविध प्रश्न विचारत सहीच्या मोहिमेला प्रारंभ झाला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा