कैलास मानसरोवर यात्रेचा कालावधी होणार कमी, ८० कि.मी. रस्त्याचे उद्घाटन

नवी दिल्ली, दि. ९ मे २०२०: कैलास मानसरोवर यात्रा आणि सीमा प्रांताला जोडणाऱ्या  नवीन युगाचा काल आरंभ झाला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी एका विशेष कार्यक्रमात   उत्तराखंडमधील धारचुला आणि चीनच्या सीमारेषेजवळ लेपुलेख यांना जोडणार्‍या रस्त्याचे उद्घाटन केले.  पिठोरा गंज वरून गुंजीला जाणाऱ्या एका वाहनांच्या ताफ्यालाही त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवला.

याप्रसंगी बोलताना संरक्षण मंत्री म्हणाले की केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्गम भागाच्या विकासासाठी विशेष दूरदृष्टी दाखवली आहे.

या महत्वाच्या रस्त्यामुळे स्थानिक लोकांच्या  स्वप्नांना आणि आकांक्षांना बळ मिळाले असून यात्राही सुफळ संपूर्ण होतील असे राजनाथ सिंग यांनी नमूद केले. रस्ते सुरू झाल्यावर  या भागातील   स्थानिक व्यापार आणि आर्थिक विकास यांना चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हिंदू, बौद्ध आणि जैन या सर्व धर्मियांना पवित्र असणारी कैलास-मानसरोवर यात्रा या रस्त्यामुळे दोन ते तीन आठवड्या ऐवजी एकाच आठवड्यात पूर्ण होईल असे त्यांनी स्पष्ट केले. घाटियाबगड वरून सुरू होणारा हा रस्ता लेपुलेख खिंडीपर्यंत जातो. सिक्कीम किंवा नेपाळ मार्गे कैलास-मानसरोवरला जाणारे रस्ते हे लांबलचक असून तेथे उंचावरून प्रवास करावा लागतो. त्यामुळे वृद्ध यात्रेकरूंना बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागत होते. या अडचणी या नवीन लेपालेख मार्गाने प्रवास करताना येणार नाहीत असे त्यांनी स्पष्ट केले.

सिक्कीम आणि नेपाळ वरून जाणारे दुसरे दोन मार्ग आहेत जिथून जाताना २०% प्रवास भारतीय हद्दीतून आणि ८० टक्के प्रवास चिनी हद्दीतून करावा लागतो. घाटीबागढ लेपालेख या मार्गामुळे आता ८४ टक्के प्रवास हा भारतीय हद्दीतून तर १६ टक्के प्रवास चिनी हद्दीतून करावा लागेल. हे अभिमानास्पद असल्याचे संरक्षण मंत्री म्हणाले.

सीमा रस्ते बांधणी दलाचे अभियंते आणि कर्मचारी यांच्या कामाप्रती  समर्पित वृत्तीचे संरक्षणमंत्र्यांनी यावेळी कौतुक केले.  कोविड-१९ च्या या कठीण काळातही सीमा रस्तेबांधणी दलाचे कर्मचारी आपल्या कुटुंबियांपासून दूर दुर्गम भागात हे काम करतात असे संरक्षणमंत्र्यांनी नमूद करत त्यांना शाबासकी दिली.

उत्तराखंडमधल्या गढ़वाल तसेच कुमाऊ  विभागाच्या विकासात सीमा रस्तेबांधणी दलाचा नेहमीच संपूर्ण हातभार लागल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नमूद केले. या कामाबद्दल सीमा रस्ते बांधणी दलाच्या सर्व स्तरावरच्या  कर्मचाऱ्यांनी कामगिरी बजावल्याचं सांगत  राष्ट्र उभारणीच्या कामात या कर्मचार्‍यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांनी गौरव केला.

अनेक अडचणींमुळे या रस्त्याच्या कामात बरेचदा व्यत्यय आल्याचे यावेळी सीमा सुरक्षा दलाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल हरपाल सिंग यांनी नमूद केले. सतत बर्फवृष्टी,  उंचावरील अस्थिर हवामान आणि अत्यंत कमी तापमान यामुळे पाच महिने काम जवळपास थांबवावे लागते. जून ते ऑक्टोबर या कालावधीत होणारी कैलास-मानसरोवर यात्रा तसेच स्थानिक लोकांचा प्रवास आणि कामानिमित्त व्यावसायिकांचा होणारा प्रवास यामुळे   बांधकामाला अजून कमी कालावधी मिळतो असं त्यांनी स्पष्ट केले.

याशिवाय गेल्या काही वर्षात अचानक येणारे पूर आणि ढगफुटी याच्यामुळे प्रचंड नुकसान झाल्याचे ही त्यांनी सांगितले. रस्त्याच्या सुरुवातीच्या वीस किलोमीटरच्या टप्प्यातल्या  पर्वतांमध्ये अतिशय कठीण दगड होते आणि जवळपास उभे सुळके होते . ज्यामुळे सीमा रस्तेबांधणी दलाच्या बऱ्याच कर्मचाऱ्यांना प्राण गमवावे लागले, तर जवळपास पंचवीस उपकरणे काली नदीत कोसळून निरुपयोगी झाली. या सर्व अडचणींवर मात करत गेल्या दोन वर्षात सीमा रस्तेबांधणी दलाने अनेक पातळ्यांवर वेगाने काम करत  आणि अत्याधुनिक तंत्राचा वापर करत आपले काम जवळपास वीस पट अधिक क्षमतेने पूर्ण केले.  या भागाच्या दुर्गमतेमुळे शेकडो टन माल किंवा यंत्र आणण्यासाठी हेलिकॉप्टरचा वरचेवर वापर करावा लागला.

या कार्यक्रमाला सेनाप्रमुख जनरल बिपिन रावत,  थलसेना प्रमुख एम एम नरवणे, संरक्षण सचिव अजय कुमार, अलमोराचे खासदार अजय तामता आणि तसेच संरक्षण मंत्रालय व सीमा रस्ते बांधणी दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा