एमआयडीसीतर्फे धारावीत दोन लाख किलो धान्याचे वाटप

मुंबई, दि. २६ मे २०२०: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कोरोनाच्या काळात सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य सातत्याने करत आहे. याच कार्याचा एक भाग म्हणून मुंबईमध्ये धारावी परिसरातील गरजू नागरिकांना दोन लाख किलो धान्याचे वाटप  करण्यात आले. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत महापे येथील एमआयडीसी कार्यालयातून अन्नधान्याने भरलेल्या ट्रक रवाना करून या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पी.अन्बलगन उपस्थित होते.

मुंबईमध्ये सर्वात अधिक कोरोनाचा फटका कुठे बसला असेल तर तो धारावी येथे आहे. या प्रादुर्भावामुळे धारावी येथील सर्व भाग प्रतिबंधित करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व दुकाने व सुविधा बंद आहेत. येथील नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून एमआयडीसीने सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत अन्नधान्य वाटपाचा उपक्रम राबविला. धारावी येथील कामराज ज्युनियर कॉलेजमधून या उपक्रमास प्रारंभ करण्यात आला. यावेळी  धान्य, तांदूळ, आटा, तेल तूरडाळ, रवा, मसाला मीठ, साबण आदींचे वाटप करण्यात आले. एकूण दोन लाख किलो धान्याचे आज वाटप करण्यात आले.

या उपक्रमाचा सुमारे दहा हजार नागरिकांना फायदा होणार आहे. यावेळी नागरिकांना सामाजिक अंतराचे महत्त्व विशद करण्यात आले. या उपक्रमास धारावी येथील अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांनीही मदतीचा हात दिला. त्याचबरोबर या वेळी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता मारुती कलकुटकी, एमआयडीसीचे सहायक अभियंता राजेश मुळे व प्रशांत चौधरी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य मिशेल झेवियर आदी उपस्थित होते.

राज्यात लॉकडाऊन घोषित झाल्यापासून स्थलांतरित झालेल्या नागरिकांना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या पुढाकाराने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. आतापर्यंत सुमारे तीन लाख किलो धान्याचे वितरण करण्यात आले आहे. याखेरीज ‘मुख्यमंत्री-कोविड १९-मदत निधीस’ विविध उद्योगसमूहांकडून व कर्मचारी वेतनातून एकत्रित केलेली १०० कोटींची रक्कम देण्यात येत आहे. यापैकी ९० कोटी रुपये मुख्यमंत्री निधीत जमा करण्यात आले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा