पुण्यातील चांदणी चौक उड्डाणपुलाला सेनापती बापट यांचे नाव देण्याची खासदार सुप्रिया सुळेंची मागणी

पुणे ११ मे २०२३: महान क्रांतिकारक, स्वातंत्र्यसेनानी ‘सेनापती बापट’ यांनी १९२१ च्या काळात मुळशी येथे, विविध गोष्टींसाठी संघर्ष करणाऱ्या शेतकरी व भूमीपुत्रांच्या मागण्यांसाठी ‘मुळशी सत्याग्रह’ आंदोलन केले. या मुळशी सत्याग्रहाला नुकतीच शंभर वर्षे पुर्ण झाली आहेत. या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर चांदणी चौकात बनत असलेल्या उड्डाणपुलाला मुळशी सत्याग्रहाचे नायक ‘सेनापती बापट’ यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी एका पत्राद्वारे केली आहे.

मुळशी सत्याग्रहाचे नायक असणाऱ्या ‘सेनापती बापट’ यांच्या स्मरणार्थ चांदणी चौक येथील उड्डाण पुलाच्या प्रकल्पाचे ‘सेनापती बापट उड्डाण पूल’ असे नामकरण करावे, त्याद्वारे स्वातंत्र्यसेनानी सेनापती बापट यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त होऊन त्यांचा लढा प्रत्येकाच्या स्मरणात राहील, असे खासदार सुळे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. मुळशी तालुक्यासाठी ‘सेनापती बापट’ यांच्या योगदानाकडे, या मागणीद्वारे खासदारांनी लोकांचे लक्ष वेधले आहे.

मुंबई-पुणे-सातारा-बंगळुरू महामार्गावरील एक महत्वाचे जंक्शन असणारा चांदणी चौक परिसर आहे. हा भाग वर्दळीचा असून नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. या परिसरात होणारी वाहतूक कोंडी होणे तसेच लहान मोठे अपघात या सारख्या समस्यांबाबत खासदार सुळे या सातत्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच केंद्र सराकरकडे पाठपुरावा करत होत्या. त्यानुसार बरीच डेव्हलपमेंट या परिसरात झाली आहे.

चांदणी चौक हा मुळशी तालुक्याचे आणि कोकणात जाण्याचे प्रवेशद्वार असून, पुणे शहराला आणि मुळशी तालुक्याला जोडण्यात या उड्डाणपूलाचा मोठा वाटा असणार आहे. त्यामुळे या उड्डाणपूलाला मुळशीकरांसाठी अत्यंत महत्वाचे योगदान देणाऱ्या ‘सेनापती बापट’ यांचे नाव योग्य ठरेल, असे पत्र खासदार सुळे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पुणे महापालिका आयुक्तांना पाठवले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा