नागपंचमी

नागपंचमी हा श्रावण महिन्यातील सण आहे. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे. कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. त्या दिवसापासून नागपूजा प्रचारात आली असे मानले जाते.

दर बारा वर्षांनी नागपंचमीच्या दिवशी देशभरातील नाथ संप्रदायाचे लोक गंगा-गौतमी (अहिल्या-गौतमी) संगमावर स्नान करतात.

आख्यायिका

एका शेतकऱ्याच्या नांगराच्या फाळाने नागिणीची तीन पिल्ले मृत्युमुखी पडली व त्यामुळे नागदेवतेचा कोप झाला अशीही समजूत प्रचलित आहे. त्यामुळे या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाही. कोणीही खणत नाही, घरी कोणीही भाज्या चिरायच्या नाही, तवा वापरायचा नाही व कुटायचे नाही असे काही नियम पालन करण्याची प्रथा आहे. श्रद्धाळू माणसे नागदेवतेची पूजा करून तिला दूध-लाह्यांचा व गव्हाच्या खिरीचा नैवेद्य दाखवतात व आपले संरक्षण कर अशी प्रार्थना करतात.

अनंत (म्हणजेच शेष), वासुकी, पद्मनाभ, कम्बल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या ८ नागांची या दिवशी पूजा केली जाते.

मात्र खालील श्लोकात वासुकी, तक्षक, कालिय, मणिभद्रक, ऐरावत, धृतराष्ट्र, कार्कोटक आणि धनंजय, असे वेगळेच नाग सांगितले आहेत.

वासुकिः तक्षकश्चैव कालियो मणिभद्रकः।
ऐरावतो धृतराष्ट्रः कार्कोटकधनञ्जयौ ॥

सांस्कृतिक महत्त्व

भारतीय संस्कृतीत अनेक प्रकारे नागांची पूजा केली जाते. नाग म्हणजे फणाधारी सर्प. याच्या फणेवर पुढच्या बाजूने दहाच्या अंकासारखे चिन्ह असते . नागाचा रंग हिरवट किंवा पिवळा असतो. त्याच्या तोंडात विष धारण करणारे दात असतात. नागाची जीभ दुभंगलेली असते. प्राचीन भारतीय लोकांनी त्याला देवत्व देऊन त्याला पूजा विषय बनवले.

स्त्रिया व नागपंचमी सण

मेंदी
या सणाच्या निमित्ताने विवाहित बहिणीला तिचा भाऊ माहेरी घेऊन येतो अशी पद्धती भारतात रूढ आहे. नागपंचमीला स्त्रिया व मुली झाडाला झोके बांधून गाणे म्हणत झोके घेतात.पूजेला जाण्यासाठी हाताला मेंदी लावण्याची पद्धतही हौसेचा भाग म्हणून आलेली दिसते.

पूर्वी नागपंचमीच्या सणापूर्वी ८ ते १० दिवस आधी गल्लीतील सर्व लहानथोर स्त्रिया एकत्र येवून फेर धरून गाणी म्हणायच्या. झिम्मा-फुगडी, घोडा-चुईफुई, पिंगा-काटवटकाना, पिंगा इत्यादी खेळ मनसोक्त खेळायच्या. खेळता-खेळता उखाणे, गाणी म्हणून मन मोकळं करायच्या.

या दिवशी महिला वर्तुळाकार आकार तयार करून झिम्मा-फुगडीसारखी नृत्ये व खेळ खेळतात.

पूजेचे स्वरूप

या दिवशी महिला घराची स्वच्छता करतात. जमिनी शेणाने सारवितात. अंगणात रांगोळी काढतात. नागाची चित्रे भिंतीवर काढतात आणि त्याची पूजा करतात. काही ठिकाणी नागाच्या वारुळापाशी महिला गाणी म्हणत जातात आणि वारुळाची पूजा करतात. भारताच्या काही प्रांतात नागपंचमीला जिवंत नागाची पूजा होते दूध- लाह्या ह्या माणसाच्या आवडीच्या गोष्टी नागांना दिल्या जातात, पण ते त्यांचे अन्न नाही हे लक्षात ठेवले पाहिजे. पावसाळ्यात तो माणसाच्या हिताचा आहार आहे.

बत्तीस शिराळा येथील नागपंचमी

सांगली जिल्हाच्या पश्चिमेला असलेला बत्तीस शिराळा हा तालुका नागपंचमीच्या उत्सवासाठी प्रसिद्ध होते. काळाच्या ओघात काही अनिष्ट पद्धती बंद करत असताना बत्तीस शिराळ्यातील या वैशिष्ट्यपूर्ण उत्सवाची पार रया गेली आहे.

पुणे – बेंगलोर महामार्गावर कोल्हापूरकडे जाताना, पेठ नाका (इस्लामपूर)पासून उजव्या बाजूला एक फाटा फुटतो. तेथून साधारण २० कि.मी वर बत्तीस शिराळा वसलेले आहे. सांगली जिल्हातील हा एकमेव प्रदेश जो निसर्गसमृद्ध आहे. बत्तीस शिराळ्यापासून जवळच चांदोली अभयारण्य, चांदोली धरण आहेत. जेेव्हा पूर्वी नागपंचमीचा हा उत्सव शिराळ्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जायचा तेव्हा नागपंचमीच्या एक महिना अगोदर येथील नाग मंडळे नाग पकडायच्या मोहिमेला निघत. हातात लांब काठी आणि नागाला ठेवण्यासाठी मडके असा लवाजमा घेऊन ५-६ तरुणांचा ग्रुप मोहीम फत्ते करत असे. पकडलेल्या नाग, साप, धामण यांची नागपंचमी उत्सव संपेपर्यंत योग्य प्रकारे काळजी घेतली जाई.

नागपंचमीच्या दिवशी शिराळा गावात ग्रामदेवतेची पूजा करून साधारणपणे १००-१२५ नागांची एकाच वेळी मिरवणूक काढली जाई. त्यानंतर नागाचे खेळ आयोजित होत. सर्वात उंच फणा काढणारा नाग, सर्वात लांब नाग अशा पकडलेल्या मंडळांना बक्षिसे मिळत. नागपंचमीस नागाचे खेळ पाहण्यासाठी हजारो नागरिक येत. यांतील आणखी एक वैशिष्ठ म्हणजे २ वर्षाच्या बालाकापासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वजण न घाबरता गळ्यात नाग/धामण घालून फोटो काढत. शिराळ्याची नागपंचमी पूर्वी देशातच नव्हे तर परदेशांतही प्रसिद्ध होती. नागपंचमीसाठी पूर्वी लाखभर लोक जमायचे. परंतु, सापांचे होणारे हाल पाहून येथील निसर्ग व वन्यजीवपेमींनी थेट मुंबई हायकोर्टात धाव घेतली. कोर्टाने वन्य जीव संरक्षण कायद्यानुसार २००२ मध्ये आदेश देऊन सापांना पकडणे, त्यांचा खेळ करणे तसेच मिरवणूक काढणे, प्रदर्शन करणे, त्यांच्या स्पर्धा भरवणे यांना बंदी केली. तसेच या आदेशाचे तंतोतंत पालन करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासन, जिल्हा कोर्ट, वन खाते आणि पोलिसांवर सोपविली. त्यामुळे काही वर्षांपासून बत्तीस शिराळ्यात फक्त प्रतीकात्मक मिरवणूक काढली जाते.

आधुनिक काळात नागपंचमीचे व्रत कसे करावे?

आजचे नागपंचमीचे व्रत नागप्रदेशातील एका तरी व्यक्तीशी संपर्क निर्माण करून करता येईल.
दात काढलेल्या आणि उपाशी ठेवून टोपलीतून आणलेल्या नागांचा छळ थांबविणे.
नाग, सापांची उपयुक्तता घरोघरी, शाळा, महाविद्यालये यांच्यामध्ये जाऊन सांगितली पाहिजे. नागांमुळे उंदरांच्या संख्येवर नियंत्रण राहते. हरित क्रांतीची मनीषा पूर्ण व्हायची तर उंदरांच्या पोटात जाणारे धान्य वाचवावे लागेल. प्रत्येक तीन पोत्यापैकी एक पोते उंदीर खातात. म्हणूनच नागपंचमीचे आधुनिक व्रत ‘धामण पाळा नि धान्योत्पादन वाढवा ‘ अशा उद्घोषणाबरोबरच ते कृतीतूनही व्हायला हवे. तरारून आलेल्या शेताकडे पाहून कृषी कन्यांना खूप आनंद होतो. मग त्या भविष्याची सुख- स्वप्ने पाहात उंच उंच झोके घेतात व हा सण साजरा करतात. या काळात मुलांनी मैदानी खेळ खेळावे, अशी जुनी प्रथा आहे. त्यासाठी मैदानी खेळांच्या स्पर्धा भरविण्याचा संकल्प श्रावणात धरावा व चातुर्मासात पूर्ण करावा.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा