पारनेर, दि.७ जून २०२० : पारनेर तालुक्याला निसर्ग चक्रीवादळाचा काही प्रमाणात तडाखा बसला आहे. तालुक्यातील अनेक ठिकाणी शाळा, घर, फळबागा, झाडे आदींचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचा माहिती अहवाल समोर आला आहे. त्यांचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.
या वाऱ्यामध्ये पारनेर शहरातील कोर्ट परिसरात आंबेडकर चौकात व पोलीस स्टेशन आवारामध्ये झाडे कोसळली आहेत.
तसेच वडनेर बुद्रुक येथील शाळेचे पत्रे उडून गेले तर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर, निघोज, देसवडे, करंदी, ढवळपुरी या ठिकाणच्या डाळिंब, आंबा आदी फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तालुक्यातील विविध भागांमध्ये ४४ घरांची काही प्रमाणात पडझड झाली आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांचे शेडनेट व शेततळ्याच्या कागदाचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या भाजीपाला व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात वादळामुळे नुकसान झाले आहे.
कृषी विभागाने नुकसानीचा प्राथमिक अंदाज पंधराशे हेक्टर दिलेला आहे. त्याचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.
वादळामुळे शेतकऱ्यांच्या पाच शेळ्या मृत्युमुखी पडल्या इतर जीवितहानी झाली नाही मात्र लाखो रुपयांचे नुकसान त्यामुळे शेतकरी वर्ग चांगलाच अडचणीत आला आहे. त्यामुळे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी











































