पिकअपच्या धडकेत दोन सख्या भावांचा मृत्यू

पंढरपूर, दि.२२ मे २०२०: तालुक्यातील गोपाळपूर येथील दोन सख्या भावांना पिकअपने धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला. हा अपघात आज पहाटे साडेपाचच्या सुमारास पंढरपूर-मंगळवेढा रस्त्यावर घडला. दोघे भाऊ पहाटे मंगळवेढा रस्त्यावर व्यायामासाठी गेले असता हा अपघात झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, गोपाळपूर येथील बाळासाहेब गुरव यांची विजय गुरव (वय १९) आणि दयानंद गुरव (वय १६) ही दोन मुले , मोठा मुलगा विजय सैन्यामध्ये भरती होण्यासाठी त्याचे मामा नागनाथ गुरव रा. जवळा यांच्याकडे गावाजवळील भोकसेवाडी ता. सांगोला येथे राहून अभ्यास करत होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तो आपल्या गावी गोपाळपूर येथे राहण्यास आला होता.

आज (शुक्रवारी) पहाटे साडेपाचच्या सुमारास विजय आणि त्याचा भाऊ दयानंद हे दोघे मंगळवेढा रस्त्यावर व्यायामासाठी निघाले होते. त्यावेळी एका पिकअप गाडीने त्यांना धडक दिल्याने दोघेही गंभीर जखमी झाले होते. येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथे हलविण्यात आले होते. परंतू दोघांचाही उपचारापूर्वीच दुर्दैवी मृत्यू झाला.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा