Pimpri-Chinchwad domestic violence cases: पिंपरी-चिंचवड शहरात कौटुंबिक हिंसाचाराने गंभीर स्वरूप धारण केले असून, गेल्या पाच महिन्यांत तब्बल ८० गुन्हे दाखल झाले आहेत. म्हणजेच, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत दिवसाआड एक गुन्हा दाखल होत असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. विशेष म्हणजे, या छळाला केवळ अल्पशिक्षित नव्हे, तर सुशिक्षित आणि स्वतःच्या पायावर उभ्या असलेल्या महिलांनाही सामोरे जावे लागत आहे, ज्यामुळे समाजात चिंता व्यक्त केली जात आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर कौटुंबिक हिंसाचाराचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
महिलांनी विविध क्षेत्रांत गगनभरारी घेतली असली तरी, घराबाहेर आणि घरांतही त्यांना छळाचा सामना करावा लागतोय. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा महिलांच्या संरक्षणासाठी असला तरी, अनेकदा महिला तक्रार करण्यासाठी उशीर करतात, तोपर्यंत परिस्थिती हाताळण्यापलीकडे गेलेली असते. यामुळे वेळीच आवाज उठवणे आणि तक्रार करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.
आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात, मोबाईल फोनने ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या असल्या तरी, त्यांचा वापर केवळ मनोरंजनापुरता मर्यादित राहिल्याने वैवाहिक जीवनात गैरसमज आणि वाद वाढत आहेत. सामाजिक जाणिवेचा अभाव आणि निर्णय क्षमतेची कमतरता यामुळे अनेक संसार उद्ध्वस्त होत आहेत. तज्ज्ञांच्या मते, तरुणांचा सामाजिक बुद्ध्यांक वाढणे गरजेचे आहे.
याव्यतिरिक्त, हुंडाबळीचे तीन गुन्हे चिंचवड, बावधन आणि महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यांमध्ये नोंदवले गेले आहेत, जिथे हुंड्याच्या छळाला कंटाळून महिलांनी आत्महत्या केल्या आहेत. या भीषण परिस्थितीवर मात करण्यासाठी विवाहपूर्व आणि विवाहपश्चात समुपदेशनाची नितांत गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे. ‘लग्न करताना केवळ प्रतिष्ठा न बघता दोन्ही कुटुंबांचे मनोमिलन व्हावे आणि नातेवाईकांनी नवदाम्पत्यांच्या संसारात अनावश्यक हस्तक्षेप टाळावा,’ असे आवाहन सुलोचना भोवरे यांनी केले आहे. तर सामाजिक कार्यकर्ते प्रकाश जुकंटवार यांनी ‘कौटुंबिक हिंसाचार ही केवळ एका कुटुंबाची समस्या नसून, सामाजिक आरोग्याचा प्रश्न आहे,’ असे सांगत समाजातील प्रत्येक घटकाला पुढे येण्याचे आवाहन केले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी;सोनाली तांबे