वंदे भारत एक्स्प्रेसचे भाडे कमी करण्याचा, रेल्वे मंत्रालयाचा विचार

पुणे, ७ जुलै २०२३ : भारतीय रेल्वेने सुरु केलेली वंदे भारत एक्स्प्रेस महाराष्ट्रातून चार मार्गावरुन धावत आहे. देशभरातही अनेक मार्गावरुन ही गाडी धावत आहे. या गाडीची लोकप्रियता अल्पावधीतच वाढली आहे.आजपासून (७ जुलै) आणखी दोन मार्गावरुन वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. राज्यात मुंबई- गांधीनगर दरम्यान पहिली वंदे भारत एक्स्प्रेस सुरु झाली होती. त्यानंतर मुंबई-पुणे-सोलापूर, मुंबई ते शिर्डी आता मागील आठवड्यात मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस सुरु झाली. परंतु आता रेल्वे मंत्रालय वंदे भारत एक्स्प्रेसचे प्रवास भाडे कमी करण्याचा विचार करत आहे.

रेल्वे कमी लांबीच्या ट्रेनचे भाडे कमी करण्याचा विचार करत आहे. कारण कमी अंतराच्या रेल्वेतील सर्व सीटचे बुकींग होत नाही. इंदूर-भोपाळ, भोपाळ-जबलपूर आणि नागपूर-बिलासपूर या मार्गावरील वंदे भारत एक्स्प्रेसचे दर कमी होणार आहेत. कारण या मार्गावरील वंदे भारत एक्स्प्रेसचे बुकींग पूर्ण होत नाही.

जून महिन्यात भोपाळ-इंदूर मार्गावरील २९ टक्केच सीटचे बुकींग झाले. इंदूर भोपाळ मार्गावर २१ टक्केच सीटचे बुकिंग झाले. तीन तासांच्या प्रवासासाठी या ट्रेनचे एसी चेअर कारचे भाडे ९५० रुपये आहेत तर एक्झीकेटीव्ह चेअर कारचे भाडे १५२५ रुपये आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रतिसाद कमी मिळत आहे.

मागील महिन्यात २७ जून २०२३ रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि गोव्यामधील मडगाव स्टेशन दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस सुरु झाली. या ट्रेनचे एसी चेअर कारचे भाडे १४३५ रुपये तर एक्झीकेटीव्ह क्लासचे भाडे २४९५ रुपये आहे. या मार्गावर विमानाचे भाडेही दोन ते अडीच हजार दरम्यान आहे. परंतु निसर्ग सौदर्यंचा आनंद वंदे भारत एक्स्प्रेसने मिळत आहे. यामुळे या मार्गावर प्रवाशांचा प्रतिसाद पूर्ण क्षमतेने मिळत आहे.

मुंबई गोवा ५८६ किमी अंतरासाठी रेल्वे प्रवास ११ ते १२तासांचा आहे. परंतु वंदे भारत एक्स्प्रेसने हा प्रवास ८ तासांवर आणला आहे. तसेच विमानाने गेल्यास चेक आऊट, चेक इन प्रक्रियेला आणि विमानतळावर जाण्यास वेळ लागतो.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा