गोल पोस्ट इतर पर्यावरण कोल्हापुर जिल्ह्यात पावसाचा कहर; चोवीस तासांत सात ठिकाणी अतिवृष्टी

कोल्हापुर जिल्ह्यात पावसाचा कहर; चोवीस तासांत सात ठिकाणी अतिवृष्टी

कोल्हापुर, ८ ऑक्टोबर २०२२: जिल्ह्यात काल पासून पावसाचा कहर पाहायला मिळाला आहे. गेल्या चोवीस तासांत सात ठिकाणी अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे‌. पावसाने पंचगंगेच्या पाणी पातळीत तीन फुटांनी वाढ झाली आहे. तर अनेक ठिकाणी शेतात पाणी शिरल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत २२.३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात ७०.६ मि.मी. इतका झाला. शाहूवाडीत ५७.५ मि.मी शिरोळ तालुक्यात ५७.६ मि.मी तर हातकणंगले तालुक्यात ४६.६ मि.मी पाऊस झाला आहे. कुंभी धरण परिसरात सर्वात जास्त म्हणजे १७५ मि.मी पावसाची नोंद झाली आहे.

गुरुवारी पंचगंगेची पातळी ९.९ फुट होती. शुक्रवारी सकाळी आठ वाजता ती १२.८ फुटांपर्यंत वाढली होती. यानंतर दिवसभर पाणी पातळी स्थिर होती. दरम्यान आज सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण आहे. तर काही ठिकाणी तुरळक सरी बरसत आहेत. तरी प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवहान केले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version