पश्चिम बंगाल, १० जुलै २०२३: पश्चिम बंगालमध्ये ८ जुलै रोजी पंचायत निवडणुक मतदानावेळी हिंसाचार झालेल्या ठिकाणांवर पुनर्मतदान घेण्यात येत आहे. राज्यातील १० जिल्ह्यातील ६९७ बूथवर पुन्हा मतदान होण्यापूर्वी नव्याने हिंसाचाराच्या घटना घडल्या. कूचबिहार जिल्ह्यात सत्ताधारी तृणमूलच्या कार्यकत्यांनी, उमेदवारांच्या घरांवर हल्ला केल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे.
पंचायत निवडणुकीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर हिंसाचार आणि हत्याकांडानंतर कूचबिहार जिल्ह्यातील ५३ मतदान केंद्रांवर आज पुनर्मतदानाचे आदेश देण्यात आले होते. रविवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी काँग्रेस उमेदवार नूरनाहर बीबी यांच्या घरांवर हल्ला केला. हल्लेखोरांनी देशी बाँम्ब फेकत गोळीबारही केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
८ जुलै रोजी मतदानावेळी हिंसाचार झालेल्या पुरुलिया, बीरभूम, जलपाईगुडी, नादिया आणि दक्षिण २४ परगणा या पाच जिल्ह्यांतील ६९७ बूधवर १० जुलै रोजी पुन्हा मतदान घेण्यात येईल, असे पश्चिम बंगाल राज्य निवडणूक आयोगाने सांगितले होते. ३० पैकी २० जिल्ह्यातील त्रिस्तरीय पंचायत निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार, मतपत्रिकांची लुट झाल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला होता.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर